Breaking News

वाढते रस्ते अपघात चिंताजनक; वर्षभरात 1203 अपघातांत 258 जण ठार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधून सायन-पनवेल महामार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, ठाणे-बेलापूरसह पामबीच रोड हे प्रमुख रस्ते आहेत. या मार्गांवर अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात. 2018 मध्ये आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल 1203 अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 920 जण जखमी झाले असून, 258 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये 286 अपघात मोटारसायकलचे आहेत. यामध्ये 252 जण जखमी झाले असून 127 जणांचा मृत्यू झाला आहे. मोटारसायकल अपघाताच्या 50 टक्के अपघातांमध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे जीवितहानी होण्याचे व डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण वाढत आहे. हेल्मेटचा वापर न करणार्‍यांविरोधात पोलीस नियमित कारवाई करत असतात, परंतु यानंतरही दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत. यामुळे पोलिसांनी कॅम्पस विथ हेल्मेट उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 19 मार्चला ऐरोली नॉलेज पार्क येथून हे अभियान सुरू केले जात आहे. या वेळी पोलीस आयुक्त संजीव कुमार स्वत: उपस्थित राहणार आहेत. आयुक्तालय क्षेत्रात रोज एका मोटारसायकलचा अपघात होतो. दोन दिवसांतून एक गंभीर अपघात होत असून प्रत्येक तिसर्‍या दिवशी एकाचा मृत्यू होतो. अपघातांत मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ते थांबविण्यासाठी चालकांनी हेल्मेट वापरावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply