पाली ः प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकरी तुषार केळकर यांचा कार्वी प्रकल्प सततच्या पावसामुळे सोमवारी कोसळला. या वेळी तेथे कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांचे 40 हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाने सार्यांचे मोठे नुकसान केले होते. अनेकांचे प्रकल्पदेखील यात मोडून
पडले आहेत.इको टुरिझम व प्रयोगशील शेतीबरोबरच तुषार केळकर हे इको आर्किटेक्ट व सर्पमित्रदेखील आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे 32हून अधिक देशांच्या 200 नागरिकांनी भेट देऊन विविध उपक्रमांत सहभाग घेतला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने जमीन ओली झाली. खांबांवर कौलांचे वजन आले आणि केळकर यांचा कार्वी प्रकल्प कोसळला. तसेच कार्वीचा वापर राहण्यासाठी व वस्तू ठेवण्यासाठीदेखील केला जात होता. या खाली असलेल्या सर्व वस्तूंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने पत्नी तेथून बाहेर असल्याने बचावली. मागील साडेतीन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनमुळे पर्यटक नाहीत आणि आता या झालेल्या नुकसानीमुळे केळकर मोठ्या आर्थिक गर्तेत सापडले आहेत. शासनाने याबाबत मदत किंवा नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केळकर यांनी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper