माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव, निजामपूरमार्गे पुण्याकडे जाणार्या मुख्य रस्त्यावरील काळ नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून, वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक बनला आहे. माणगाव, निजामपूरमार्गे पुण्याकडे जाणार्या महत्त्वाच्या अशा मार्गावरील चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पानोसे गावाकडे जाणार्या वळणावरील काळ नदीच्या पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने या पुलावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. हा पूल ताम्हाणी घाटाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. येथून दिघी, माणगाव, पुणे अशी वाहतूक सुरू असते. माणगाव तालुक्यातील मोर्बा व काळ नदीवरील पूल धोकादायक झाले आहेत. येथे धोकादायकचे फलकही नसल्याने भीषण अपघाताची शक्यता आहे. संरक्षक कठडे तातडीने बसवून धोक्याची सूचना देणारे फलक लावावेत, अशी मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे.
निजामपूर भागात जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे. पावसाळ्यात पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने येथून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलकही नाहीत. त्यामुळे अपघात होऊ शकतो. याची तातडीने दखल घेत येथे संरक्षक कठडे बांधावेत. -योगेश खडतर, दैनंदिन प्रवासी, माणगाव