Breaking News

गटारगंगा की स्वर्गलोक?

‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’ अशा शब्दांत मंगळवारी जया बच्चन यांनी रवि किशन व कंगना राणावतला फटकारले. मग कंगनाने जया बच्चन यांना ट्विटरद्वारे तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले. माझी थाळी मी स्वत: कमावलेली आहे, असा स्वाभिमानी सूर तिने आळवला. वस्तुत: बॉलिवुडला सरसकट गटारगंगा असे कुणीच म्हटलेले नाही. बॉलिवुडमधील अपप्रवृत्तींना गटारगंगा म्हटले तर त्यात चूक काय? लॉकडाऊनच्या काळामध्ये चित्रपटगृहे संपूर्णत: बंद असली तरी सर्वांना हवीहवीशी वाटणारी चंदेरी दुनिया मात्र नको त्या कारणांसाठी सध्या चर्चेत आहे. बॉलिवुड ही घराणेशाही, अमलीपदार्थ, भ्रष्ट व्यवहार, खूनखराबा अशा विविध विळख्यांमध्ये अडकलेली दुनिया आहे असे काही जणांचे मत आहे तर काही अपवादात्मक दुर्घटना अथवा अनैतिक व्यवहारांवरून बॉलिवुडला सरसकट बदनाम करू नका, असे काही जण म्हणत आहेत. हा वाद सुरू झाला तो अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणानंतर. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचे गूढ अजूनही कोणालाच उकललेले नाही. ईडी, सीबीआय आणि एनसीबी अशा तीन तपास संस्था या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जंग-जंग पछाडत आहेत. यातून सत्य काय ते बाहेर येईलच. याच तपासादरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने बेधडक आरोपांच्या फैरी झाडून बॉलिवुडची अक्षरश: पोलखोल केली. तिच्या आक्रमक प्रश्नांना उत्तरे देणे राज्यकर्त्यांना देखील कठीण झाले. परिणामी तिच्या तथाकथित बेकायदा कार्यालयावर बुलडोझर फिरवण्याची कामगिरी राज्य सरकारने उत्तरादाखल केली. अभिनेत्री कंगना राणावतने राज्यकर्त्यांची फे-फे उडवली तशीच बॉलिवुडमधील काही धेंडांची देखील पंचाईत केली. बॉलिवुडमध्ये शोषणाची परंपरा असून घराणेशाहीच्या जोरावर ही चंदेरी दुनिया चालते असा सनसनाटी आरोप तिने केला. इतकेच नव्हे तर घराणेशाही आणि अमलीपदार्थांच्या चिखलाने गढूळ झालेली ही गटारगंगा साफ करायला हवी, असा आक्रमक पवित्रा तिने घेतला. काही सिनेतारे-तारकांनी कंगनाचे समर्थन केले. परंतु ज्यांच्या हातात बॉलिवुडची सत्ता आहे, त्या पहिल्या फळीतील नामवंत निर्माते-दिग्दर्शक व सितार्‍यांनी मौनच बाळगणे पसंत केले. मंगळवारी लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार रवि किशन यांनी बॉलिवुडमधील गटारगंगेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर समाजवादी पक्षाच्या खासदार व विख्यात अभिनेत्री जया बच्चन संतापल्या. त्यांनी बॉलिवुडला गटारगंगा म्हटल्याबद्दल कंगना समर्थकांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. बॉलिवुडला गंटारगंगा म्हणणार्‍यांची मला लाज वाटते. या घटकेला बॉलिवुडला केंद्र सरकारने पाठबळ देण्याची गरज आहे. जेथे आपण नाव आणि पैसा कमावला त्याला अशी नावे ठेवणे अनुचित आहे, अशी टीका त्यांनी केली. श्रीमती बच्चन यांनी बॉलिवुडमधील प्रस्थापितांचे म्हणणे ठामपणाने मांडले हे बरेच झाले. कुठल्याही क्षेत्रात प्रस्थापितांना आपले कार्यक्षेत्र गटारगंगा वाटणे अशक्यच असते. परंतु प्रश्न आहे तो, बाहेरून आलेल्या नवोदितांच्या वाट्याला काय येते याचा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वादाशी भारतीय जनता पक्षाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. भाजपने बॉलिवुडला ना कधी गटारगंगा म्हटले, ना स्वर्गलोकीची गंगा. तरीही अन्य विरोधी पक्ष हेतुपुरस्सर या वादाला खतपाणी घालत आहेत. या सार्‍या गदारोळात सुशांत सिंह राजपूतचे मृत्यू प्रकरण मात्र मागे पडले, हे दुर्दैव.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply