
श्रीवर्धन ः प्रतिनिधी
प्रदूषणासाठी सर्वांत घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत शासनाने आदेश काढून बंदी आणली आहे. मागील वर्षी प्रत्येक नगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दीत व्यापारी, भाजी दुकानदारांच्या दुकानावर धाड घालून हजारोंच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या, मात्र यानंतरही काही व्यापारी छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्लास्टिक पिशव्यांवर निर्बंधासाठी भरारी पथकाचीही नेमणूक करण्यात आली होती. व्यापारी, छोटे दुकानदार तसेच फळविक्रेत्यांकडे पिशव्या आढळल्यानंतर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती. यानंतर बरेच दिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद होता, परंतु लॉकडाऊननंतर सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर पाहायला मिळत आहे. श्रीवर्धन शहरातील विक्रेत्यांकडून बिनधास्तपणे प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देण्यात येत आहेत. प्रशासनाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper