नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी या महामारीवर मात करणार्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनातून बरे झालेल्यांच्या भारतातील एकूण संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सोमवारी (दि. 28) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 74 हजार 893 रुग्णांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली. याचबरोबर देशभरात कोरोनावर मात करणार्यांची संख्या आता 50 लाख 16 हजार 520वर पोहचली आहे.
सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने 60 लाखांचा आकडा पार केला आहे. 24 तासांमध्ये 82 हजार 170 नवे कोरोना रुग्ण आढळले असून, एक हजार 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 60 लाख 74 हजार 703वर पोहचली आहे. यामध्ये नऊ लाख 62 हजार 640 अॅक्टिव्ह केसेस, कोरोनातून बरे झालेले व डिस्चार्ज मिळालेले 50 लाख 16 हजार 521 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 95 हजार 542 जणांच्या संख्येचा समावेश आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतात रुग्ण व मृतांचा आकडा वाढत असताना कोरोनावर मात करणार्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, देशात 27 सप्टेंबरपर्यंत सात कोटी 19 लाख 67 हजार 230 नमूने तपासण्यात आले असून, यातील सात लाख नऊ हजार 394 नमूने रविवारी तपासण्यात आले असल्याची माहिती ‘आयसीएमआर’कडून प्राप्त झाली आहे.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …
RamPrahar – The Panvel Daily Paper