Breaking News

कोरोना संकटात भाजप कार्यकर्त्यांकडून जनतेसाठी जबाबदारीने काम; आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप कार्यकर्त्यांनी कोणतेही राजकारण न करता कोरोना काळात लोकांसाठी जबाबदारीने काम केले, असे गौरवोद्गार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) येथे काढले. ते ई-पुस्तिका प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने आणि आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यातील तालुका व शहर मंडलांच्या वतीने लाखो नागरिकांना कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून समाजाभिमुख कार्य 23 मार्चपासून हाती घेण्यात आले. या समाजाभिमुख कार्याची दखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेऊन पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केलेल्या सहकार्याची माहिती तालुकास्तरावरील जनतेला ई-पुस्तिकेच्या माध्यमातून व्हावी यासाठी उत्तर रायगड जिल्हा तसेच खोपोली, पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर मंडलच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या सेवाकार्य ई-पुस्तिका प्रकाशन सोहळा पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाला. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर मनोगत व्यक्त करीत होते. या सोहळ्यास कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, के. के. म्हात्रे, प्रल्हाद केणी, संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, कोकण मीडिया सेलचे श्री. अभिजित, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, मोना अडवाणी, बिना गोगरी, अमरीश मोकल यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, जनतेसाठी सरकारने काम करणे अपेक्षित असते, मात्र राज्य सरकार सत्ता कशी टिकवता येईल यावर लक्ष केंद्रित करून काम करीत आहे. या तिघाडी सरकारला लोकांच्या प्रश्नांची जाण राहिली नाही. हे सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत सत्ता ढकलत नेण्याचे काम करीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी त्या वेळी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा न करता सरसकट भरपाई द्यावी अशी मागणी केली होती, मात्र आता मुख्यमंत्री शेतकर्‍यांना सरसकट भरपाई का देत नाही असा सवाल उपस्थित करून त्यांना सोयीने विसर पडला आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला. भाजप कार्यकर्त्यांनी समाजाप्रती आदराची भूमिका ठेवून सेवाभावाने काम केले. राज्यात भाजप काम करीत होता, तर सत्तेत असलेले राज्य सरकार फक्त दिखाऊपणा करीत होते. संकटाच्या प्रसंगाला धावून येणारा पक्ष असे स्वतःला म्हणवून घेणारा शिवसेना पक्ष सत्तेत बसल्यावर काहीही करू शकला नाही. कोरोना महामारी जगात पसरत असताना आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वेळेवर लॉकडाऊन लागू करीत देशावरचे फार मोठे संकट दूर केले तसेच नागरिकांच्या हितासाठी पॅकेज आणि अन्य योग्य निर्णय घेतले असे नमूद करताना राज्यात आलेल्या अतिवृष्टी संकटात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर व इतर भाजप नेते शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकर्‍याला आधार देत आहेत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र पुलावर उभे राहून दिखावा करीत आहेत आणि घरी राहून महाराष्ट्राचा आढावा घेत आहेत, याकडेही आमदार ठाकूर यांनी लक्ष वेधले. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भाजप उत्तर रायगड कमिटीच्या वतीने जिल्ह्यात लोकांना अन्नधान्य, मोदी कम्युनिटी किचनच्या माध्यमातून भोजन, मास्क, सॅनिटायझर, औषधे, परप्रांतीयांना तसेच कोकणात जायला नागरिकांना सहकार्य, कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी मदत अशी सामाजिक बांधिलकीची अनेक कामे कोरोना काळातही भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली याचा आपल्याला अभिमान आहे असे अधोरेखित करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्याप्रती कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. या वेळी त्यांनी कोरोनाने निधन पावलेले बापू घारे, राजू बनकर यांनी स्वतःकडे दुर्लक्ष करीत लोकांच्या सेवेसाठी तत्परतेने केलेल्या कामाची आठवण करीत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. आमदार महेश बालदी म्हणाले की, कोरोनाच्या या वैश्विक महामारीच्या काळात गोरगरीब तसेच आदिवासी नागरिकांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे काम भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून हाती घेतले आणि लॉकडाऊनच्या कालावधीत लोकसेवक कसा असावा हे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता विरोधकांना दाखवून दिले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न घेता देशहित जपत गोरगरीब नागरिकांना मदत केली याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.

  • लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अभिनंदनाचा ठराव

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देण्याचे महान कार्य हाती घेतले. लाखो जणांना त्यांनी सर्वतोपरी मदत केली. त्याची पोचपावती म्हणून त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल या कार्यक्रमात रायगड जिल्हा भाजपच्या वतीने अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला तसेच कोरोना काळात मदतीचा हात देत असतानाच रुग्णांना आधार देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पीपीई किट घालून कोरोनाबाधितांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. त्याबद्दल या दोन्ही आमदारांचे या कार्यक्रमात आभार व्यक्त करण्यात आले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply