अलिबाग : प्रतिनिधी
अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन अर्ज सोमवारी (दि. 9) उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयात पोलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने दिवसभराचे काम सायंकाळी उशिरा स्थगित केल्याने या संदर्भात मंगळवारी (दि. 10) पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, गोस्वामी यांच्या जामीनावरही मंगळवारी निणर्य होऊ शकतो.
मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन अर्ज सोमवारी फेटाळून लावला, पण त्यांना कलम 439 अन्वये जामीन मिळवण्यासाठी नियमित जामीन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा असल्याचे सांगितले तसेच गोस्वामींना अलिबाग सत्र न्यायालयात जामीन करण्याची मुभा देण्यात आली असून, चार दिवसांत यावर निकाल देता येईल, असेही हायकोर्टाने म्हटले होते. त्यानुसार गोस्वामींनी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज केल्याचे वृत्त आहे.
अलिबाग येथे सुनावणीवेळी माजी खासदार किरीट सोमय्या, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते आदी उपस्थित होते.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper