मुरूड ः प्रतिनिधी
दरवर्षी डिसेंबर महिन्यात पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती स्वच्छता मोहीम राबविते. पद्मदुर्ग किल्ल्यात पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यामुळे पर्यटक किल्ला पाहायला घाबरतात. त्या पार्श्वभूमीवर मुरूडचे शिवप्रेमी दरवर्षी किल्ला स्वच्छ करतात. किल्ल्याच्या स्वच्छतेसह कोटेश्वरी देवीच्या मूळ स्थानाची स्वच्छता करून पूजन करण्याचे काम पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीचे अध्यक्ष अशील ठाकूर यांनी केले. या वेळी योगेश सुर्वे, राहुल कासार, सुनील शेळके, अचित चव्हाण, संकेत आरकशी, खरआंबोळी ग्रुप. असे 60 शिवभक्त उपस्थित होते.
पद्मदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आहे. कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला व त्यासमोरील पडकोट. पडकोट नामशेष होत आहे, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरूज तग धरून आहे.
या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे आहे. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.
RamPrahar – The Panvel Daily Paper