धरमशाला : वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी येथे असलेल्या जोशी मठाजवळ रविवारी (दि. 7) सकाळी हिमकडा कोसळला. त्यामुळे धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत अचानक प्रचंड वाढ होऊन नदीकाठावरील घरांना तडाखे बसले. पाण्याच्या प्रवाहात सुमारे 100 ते 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. हिमकडा कोसळल्यानंतर हिमस्खलन होऊन धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ झाली. यामुळे रैनीसह अनेक गावांमध्ये पाण्याचा मोठा प्रवाह येऊन घरे उद्ध्वस्त झाली. पाण्याच्या तडाख्यात ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाचेही नुकसान झाले आहे, तर नदीवरील दोन पूल वाहून गेले आहेत. या घटनेनंतर प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य हाती घेण्यात आले असून, अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील घटनेचा आढावा घेतला आहे. या दुर्दैवी परिस्थितीवर मी सतत लक्ष ठेवून आहे, तसेच मदतकार्याविषयी माहिती घेत आहे. संपूर्ण भारत तेथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करीत आहे, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.
उत्तराखंडमधील सर्व रहिवाशांना आश्वस्त करतो की, नरेंद्र मोदी सरकार या संकटकाळात उत्तराखंडसोबत आहे. आपद्ग्रस्तांना शक्य ती सर्व मदत केली जाईल.
-अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
RamPrahar – The Panvel Daily Paper