वनविभागाची कारवाई
पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात वनविभागाने सोमवारी (दि. 8) एका रिक्षेवर छापा टाकून खवल्या मांजरांची तस्करी उधळून लावली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
चिपळूण तालुक्यातून एका रिक्षेमधून वन्यजीवांची तस्करी केली जात असल्याची खबर वनविभागाचे रोहे सहाय्यक वनसंरक्षक विश्वजित जाधव यांना मिळाली होती. यानुसार कशेडी घाटातील भोगाव खुर्द गावच्या हद्दीत सापळा रचण्यात आला.
या वेळी तीन जण खवल्या मांजराची मादी एका पिल्लासह पोत्यात भरून रिक्षेतून (एमएच 08-एक्यू 4441) नेत असताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. हस्तगत वन्यजीवांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 50 लाखांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
या प्रकरणी चिपळूण तालुक्यातील कालुस्ते येथील आरोपी रिक्षाचालक-मालक नरेश प्रकाश कदम, चिवेली येथील सागर श्रीकृष्ण शिर्के आणि वाघिवडेतील सिकंदर साबळे या तिघांविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.