अलिबाग : प्रतिनिधी
रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण 28 टक्क्यांनी कमी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) व मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील जमशेद भाभा थिएटर येथे आयोजित केलेल्या 31व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. राज्याचे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित होते. अपघात कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्यातून वेगवेगळे उपक्रम राबवले. सुरक्षितरित्या वाहन चालवण्याबाबत मार्गदर्शन करणारे फलकदेखील महामार्गावर लावण्यात आले आहेत. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी चार इंटरसेफ्टर वाहने उपलब्ध करून दिली. यातून बेजबाबदार वाहनचालक कॅमेर्यात बंदिस्त होतात व त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होते. त्यामुळे रस्ते अपघातांवर नियंत्रण आले. रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्यांचे प्रमाण 10 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. रायगड जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण 28 टक्क्यांनी कमी झाले आहे.