शेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना गुंतवणूकदार या नात्याने त्यात प्रवेश करावा, अशी अनेकांची इच्छा होते, पण आता बाजार इतका तापला आहे की त्यात नवे गुंतवणूकदार पोळले जाण्याची शक्यता वाढली आहे. तसे काही होऊ नये म्हणून म्युच्युअल फंडात आणि त्यातही बॅलन्स अॅडव्हानटेज फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करावी की नाही, हा आपल्या देशात अजूनही वादाचा विषय आहे. त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण असे की जे शेअर बाजाराला भांडवलशाही मॉडेल मानतात, त्यांना वैचारिकदृष्ट्या ते चुकीचे वाटते, तर दुसरे कारण म्हणजे शेअर बाजाराविषयी असलेले गैरसमज. अर्थात गैरसमजापोटी शेअर बाजाराच्या वाट्याला न जाणार्यांची संख्या अधिक आहे. भांडवलशाही मॉडेल म्हणून शेअर बाजाराचे मॉडेल ज्यांना मान्य नाही, त्यांना गुंतवणुकीचा दुसरा चांगला पर्याय नसल्यामुळे त्यापैकी बहुतेक जण गुंतवणूक शेअरमध्येच करत असतात, फक्त ते जाहीरपणे तसे मान्य करत नाहीत. शेअर बाजार हा सट्टाबाजार आहे, तो श्रीमंतांचा खेळ आहे, शेअर बाजारात पैसे जातात, मिळत काहीच नाही, त्यावर दररोज लक्ष ठेवणे शक्य असेल तरच ती गुंतवणूक करावी, असे अनेक गैरसमज आहेत. त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या भारतीय नागरिकांचे प्रमाण खूपच कमी आहे.
एलआयसीचा विक्रमी नफा
गंमत म्हणजे आपल्या गुंतवणुकीवर जोखीम नको म्हणून अनेक जण एलआयसीकडून पॉलिसी घेतात. अशा सर्व पॉलिसीधारकांना परतावा देण्यासाठी एलआयसी मात्र शेअर बाजारातच बहुतांश गुंतवणूक करत असते. एवढेच नव्हे तर शेअर बाजारात गुंतवणूक करणारी भारतातील ती सर्वांत मोठी संस्था आहे. अर्थातच एलआयसी त्यातून मोठा नफा कमावते आणि त्यातील वाटा पॉलिसीधारकांना बोनसच्या रूपाने वाटते. या वर्षी तर एलआयसीने शेअर बाजारातील गुंतवणुकीतून जानेवारीअखेर विक्रमी 33 हजार 85 कोटी रुपये नफा मिळविला आहे. पहिल्या नऊ महिन्यांत 64 हजार कोटी रुपये गुंतवून इतका भरभक्कम नफा मिळविणे हा एक विक्रमच आहे. गेल्या वर्षीचा वर्षभराचा नफा 18 हजार कोटी रुपये होता. याचा अर्थ पुढील दोन महिन्यांत आणखी तीन हजार कोटी रुपये कमावले तर गेल्या आर्थिक वर्षापेक्षा दुप्पट नफा एलआयसीने कमावला, असे म्हणता येईल आणि ते सहज शक्य आहे. कारण बाजारातील तेजी अजूनही थांबलेली नाही. आता एलआयसी बोनस किती जाहीर करते ते पाहायचे.
देशी गुंतवणूकदार सरसावले!
लॉकडाऊन आणि त्यामुळे नागरिक घरीच बसल्यामुळे बसल्या बसल्या काही पैसे तरी कमवू, असा विचार करून शेअर बाजारात प्रथमच गुंतवणूक करणार्यांची संख्या किमान 50 लाखांनी वाढली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या भारतीयांचे प्रमाण त्यामुळे वाढले असले तरी विकसित देशांपेक्षा ते अजूनही खूप कमी आहे. भारतातील शेअर बाजार हा जगातील एक जुना शेअर बाजार मानला जातो आणि अगदी अलीकडे त्याची उलाढाल जगात पहिल्या दहांत गणली जात आहे, मात्र ती उलाढाल करतात ते परकीय गुंतवणूकदार. अर्थातच तेच त्याचा फायदाही घेऊन जातात. या वर्षी त्यांनी 1.7 लाख कोटी रुपये भारतीय शेअर बाजारात गुंतविले असून त्यामुळेच बाजार प्रथमच 50000 अंशांवर गेला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत एक गोष्ट मात्र चांगली झाली, ती म्हणजे भारतीयांची शेअर बाजारातील गुंतवणूक दोन्ही मार्गांनी वाढली आहे. त्यातील काही जण थेट शेअरची खरेदी-विक्री करू लागले आहेत, तर काही म्युच्युअल फंडाच्या मार्गाने गुंतवणूक करू लागले आहेत. एसआयपी म्हणजे दर महिन्याला विशिष्ट रक्कम गुंतविणे. या मार्गाने दर महिन्याला सरासरी आठ हजार कोटी रुपये म्युच्युअल फंडाच्या मार्गाने शेअर बाजारात येत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे जेव्हा परकीय गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसा काढून घेतात, तेव्हाही बाजार मोठ्या प्रमाणावर कोसळत नाही असा गेल्या दोन-तीन वर्षांचा अनुभव आहे.
हीच खरी धोक्याची घंटा
या चर्चेचा एक अर्थ असा की शेअर बाजाराकडे भारतीय गुंतवणूकदार आकर्षिले जात आहेत. शेअर बाजारात दररोज होणारी उलाढाल याचा अर्थ त्या देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे, असा थेट नसला तरी तो देश गुंतवणूकदारांना आश्वासक वाटत आहे असा घेतला जातो एवढे नक्की. या निकषाने भारतीय शेअर बाजाराकडे पाहिले तर आज भारत सर्वांनाच आश्वासक वाटत आहे. कारण इमर्जिंग इकोनॉमीज असे ज्या देशांना म्हटले जाते, त्यात सर्वाधिक गुंतवणूक आज भारतात होत आहे शिवाय त्यांच्या पाठोपाठ भारतीय गुंतवणूकदारही पुढे सरसावले आहेत. याचा एकत्रित परिणाम म्हणजे बाजार साजरे करत असलेले नवनवे उच्चांक! पण हीच खरी धोक्याची वेळ असते. शेअर बाजाराची चर्चा माध्यमांमध्ये अशा वेळी वाढते. तेथे कशी अव्वा की सव्वा कमाई केल्याच्या गोष्टी प्रसिद्ध होऊ लागतात. त्या ऐकून आणि वाचून छोटे गुंतवणूकदार शेअर बाजारात उडी घेतात आणि मोठ्या नुकसानीला सामोरे जातात. तसे होऊ नये म्हणून अशा कमी अनुभवी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या मार्गाने जायला हवे हे आपण मागे पाहिलेच. आता आपण त्यातही कोणत्या योजनांचा विचार करावा हे पाहू.
निवडा बॅलन्स अॅडव्हानटेज फंड
शेअर बाजार गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनमुळे कोसळला होता. तेथून तो तब्बल 80 टक्के वधारला आहे. आता तो असाच वर जात राहील असे मानता येणार नाही. आपल्या गुंतवणुकीला चांगला परतावा मिळत आहे हे पाहून परकीय तसेच देशी गुंतवणूकदार आपले शेअर विकण्यास सुरुवात करतील. त्यामुळे शेअर बाजारात आता सतत चढउतार होत राहील. शेअर बाजार वधारल्यामुळे अर्थातच इक्विटी म्युच्युअल फंडांचे एनएव्ही वाढले आहेत. त्यामुळे अशा म्युच्युअल फंडांत दिसत असलेला नफा जमा करून घेऊ, असे गुंतवणूकदारांना वाटणारच आहे. अशा वेळी ज्यांना म्युच्युअल फंडाच्या मार्गाने शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची, त्यांनी नेमके काय करावे, असा प्रश्न आहे. अशांनी डेट, इक्विटी आणि सोने अशा तिन्हीत गुंतवणूक करणार्या बॅलन्स अॅडव्हानटेज फंडांमध्ये गुंतवणूक करावी, हे त्याचे उत्तर आहे. बाजारातील बदलत्या परिस्थितीनुसार इक्विटीचा वाटा हे फंड कमी अधिक करत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित राहतात. या प्रकारच्या म्युच्युअल फंडांनी गेल्या वर्षी 14 ते 25 टक्के परतावा दिला आहे. हा परतावा इक्विटी फंडांपेक्षा कमी असला तरी त्यात इक्विटी फंडांत असते तेवढी जोखीम नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. अर्थात ज्यांना जोखीम घ्यायची आहे, त्यांना अजूनही इक्विटी म्युच्युअल फंड खुणावत आहेतच.
काही चांगले बॅलन्स अॅडव्हानटेज फंड
* मिराई असेट हायब्रीड इक्विटी फंड
* कॅनरा रोबेकोइक्विटी हायब्रीड फंड
* कोटक असेट अलोकेटेर फंड
* आयसीआयसीआय प्रूडन्सीएल रेग्युलर सेव्हिंग फंड
* डीएसपी इक्विटी अँड बाँड फंड
-यमाजी मालकर , ymalkar@gmail.com