मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाने डोके वर काढले आहे. वडेट्टीवार यांनी साधू आणि संत यांची तुलना करताना साधूंविषयी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलेच भडकले आणि त्यांनी काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला. वडेट्टीवार यांच्या साधूबद्दलच्या विधानावरून भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने आंदोलनाची हाक दिली आहे, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष्य केले आहे. वडेट्टीवार असो किंवा दोन्ही काँग्रेसचे इतर नेते असो हे लोक आताही हे स्वीकार करू शकत नाहीत की, मोदी सरकारमध्ये राम मंदिराचे निर्माण कार्य होत आहे आणि देशाचा प्रत्येक हिंदू या महान कार्यात आपले योगदान देण्यासाठी पुढे येत आहे. यासाठी हे आपल्या साधू-संताचा अपमान करत आहेत. कधी पालघरमध्ये झालेल्या संतांच्या हत्येच्या घटनेला दाबून टाकतात, तर कधी साधूंना नालायक म्हणतात. हिंदुस्तानाच्या राजकारणातून अशा प्रकारची विचारसरणी असलेल्या नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा लवकरच सफाया होईल, असा संताप पाटील यांनी व्यक्त केला आहे. वडेट्टीवाराचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात त्यांनी साधूंबद्दल वाद निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे. साधू हे नालायक असतात, असे विधान वडेट्टीवार यांनी केले होते. त्या विधानावर त्यांनी खुलासाही केला. ‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या विचारधारेवर महाराष्ट्र उभा आहे. संत आणि साधू यामध्ये फरक आहे. संत हा समाजासाठी समर्पित असतो. संत दिशादर्शक असतात. साधू हे समाजाला लुबाडणारे आहे. त्यावर आजही मी ठाम आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper