पीक, फळबागांचे नुकसान, भरपाईची मागणी
मुंबई : प्रतिनिधी
हवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी संकटात आला आहे. राज्य शासनाने या संकटात मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. रब्बी पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. गुरुवारी सायंकाळपासून विजांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि पाऊस सुरू झाला. काही ठिकाणी आधीपासूनच पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, भुईमूग, हरभरा, ज्वारी, वाल, पावट्याचे मोठे नुकसान झाले आहे, तर द्राक्ष, केळी, आंबा या फळबागांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने नुकसभारपाई देण्याची मागणी शेतकर्यांमधून होऊ लागली आहे.
खराब हवामानामुळे मच्छीमारही त्रस्त
मुरूड : खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या होड्यांनी खराब हवामानामुळे पुन्हा किनारा गाठला आहे. वातावरणात वारंवार बदल होत असल्याने मच्छिमारांना आर्थिक फटका बसत आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार काही भागांत वादळी वार्यासह अवकाळी पाऊस पडला, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे बहुतांशी भागातील होड्या किनार्याला लागलेल्या दिसून आल्या, तसेच काही बोटींनी मुंबई येथे आसरा घेतला आहे.

मासेमारीचे आता फक्त तीन महिने बाकी राहिले आहेत. राज्य शासनाकडून मिळणारी मदत ही फारच तुटपुंजी व वेळखाऊ असणारी असते. आता तरी शासनाने मच्छिमारांना विशेष पॅकेज जाहीर करून मदतीचा हात द्यावा.
-मनोहर बैले, उपाध्य, रायगड जिल्हा मच्छीमार संघ
RamPrahar – The Panvel Daily Paper