Breaking News

अधिवेशनात घुमला जय श्रीरामचा नारा

खंडणीखोरांना समर्पण कळणार नाही -फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (दि. 4) चौथ्या दिवशी राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित करीत कोणत्या निधी कायद्यांतर्गंत पैसे मागितले जात आहेत, अशी विचारणा केली. प्रभू श्रीरामाने यांना कंत्राट दिले आहे का, असा सवाल विचारताच सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून संताप व्यक्त करताना हिंमत असेल तर राम मंदिरावर चर्चा लावा, असे आव्हानच देऊन टाकले. या वेळी सभागृहात जय श्रीरामचा नारा घुमला.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उभे राहिले होते. ‘माझ्याकडे मनोहर कुलकर्णी नावाची एक व्यक्ती आली होती. या वेळी त्याने भगवान श्रीरामाच्या नावे मंदिरासाठी पैसे मागितले जात असून, मी दिले नाही तर धमकावले जात असल्याचे सांगितले. अशा कोणत्या निधी कायद्यांतर्गंत हे पैसे गोळा करीत आहेत. रामाने यांना टोलवसुलीचे कंत्राट दिले आहे का? रामाच्या नावाने पैसा गोळा करणारे हे कोण, असे प्रश्न विचारले.

यावरून संतापलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिरावर चर्चा सुरू आहे का, अशी विचारणा करून तसे असेल तर स्वतंत्र चर्चा लावा. ज्यांना खंडणी गोळा करण्याची सवय आहे त्यांना समर्पण कळणार नाही. हिंमत असेल तर चर्चा लावा. काही अडचण नाही, अशा शब्दांत पटोले यांना खुले आव्हान दिले. या वेळी भाजप सदस्यांकडून सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply