Breaking News

मुंबई स्फोटक कारप्रकरणी भाजप आक्रमक; हात बांधून कोणी आत्महत्या करू शकत नाही -फडणवीस; विधानसभेत खडाजंगी

मुंबई : प्रतिनिधी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यानंतर विधानसभेत या मुद्यावरून भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मी मृतदेहाचे फोटो पाहिले असून हात बांधून कोणी आत्महत्या करू शकत नाही, असे सांगत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात गाडी घरगुती वापरासाठी विकत घेतली असल्याचे म्हटले आहे. गाडीचे स्टेअरिंग जॅम झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मग क्रॉफर्ड मार्केटला जाऊन ते कोणाला भेटले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. घटनास्थळी सर्वांत आधी पोहचणारे सचिन वाझे यांना ओळखत होते का? इतके योगायोग कसे काय? तुम्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाही. मी मृतदेह पाहिलेला असून हात बांधलेले आहेत. हात मागे बांधून आत्महत्या करता येत नाही, असे सांगत फडणवीसांनी आक्षेप नोंदवला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची नव्हती असे पुन्हा एकदा सांगत इंटिरिअरसाठी यांच्याकडे देण्यात आली होती, मात्र बिल थकल्याने गाडी ताब्यात ठेवण्यात आली होती असे सांगितले. तसेच हात बांधण्यात आले नव्हते असे सांगत महाराष्ट्र, मुंबई पोलीस तपास करण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले. फडणवीसांनी या वेळी पोलिसांच्या आणि गृहमंत्र्यांच्या बोलण्यात विसंगती असल्याचा आरोप केला. हे कोणाला वाचवण्यासाठी सुरू आहे? अशी विचारणादेखील त्यांनी केली. अनिल देशमुख यांनी यावेळी फडणवीसांना त्यांच्याकडे असणारी सर्व माहिती आपल्याकडे द्यावी अशी विनंती केली. पुढे बोलताना त्यांनी सचिन वाझे यांनी तुमच्या अर्णब गोस्वामीला आतमध्ये टाकले म्हणून तुमचा राग आहे का त्यांच्यावर? अशी विचारणा केली. यावरून भाजप आक्रमक होत भाजप नेते आशिष शेलार यांनी गृहमंत्र्यांच्या बोलण्यात विसंगती असल्याचे सांगितले.

सुधीर मुनगंटीवार यांचा आक्षेप

विधानसभेचे काही महत्व आहे की नाही. गृहमंत्र्यांनी शब्द मागे घ्यावे किंवा तुम्ही ते रेकॉर्डवरुन काढावे. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीला अटक केली म्हणून त्याचे नाव घेतले जाणे असे म्हणणे हे राजकीय, संविधानिक पाप आहे. नियमांचे पुस्तक पाहिलेत तर विरोधी पक्षनेतेपद मुख्यमंत्रीपदाच्या तोडीस तोड मानले जाते. इतकी महत्त्वाची माहिती दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी गांभीर्याने उत्तर दिले पाहिजे. एनआयएला चौकशी देण्यामागे कसली भीती आहे, अशी विचारणा भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी केली.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply