600 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; रुग्णवाढ रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान
नवी मुंबई ः प्रतिनिधी
नवी मुंबईत 15 मार्च 2019 रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. त्याला सोमवारी वर्ष झाले असून वर्षभरात नवी मुंबईत 1139 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 603 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये एकच मृत्यू होता. या वर्षी 15 दिवसांत 19 जणांचा आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षी 8 मार्चला नवी मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. फिलिपाइन्सवरून आलेल्या एका धर्मप्रचारकामुळे नवी मुंबईत ही संख्या नंतर 50 हजारांच्या घरात गेली आणि एक हजारापेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला. कोरोनाचा पहिला मृत्यू नवी मुंबईत 15 मार्च 2020 रोजी झाला होता. त्यानंतर हळूहळू रुग्णवाढ होत मृत्यूंची संख्याही वाढत गेली.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात फक्त एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यूची संख्या वाढत जात महिन्याला शंभरपेक्षा अधिक झाली. जुलैमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 207 जणांचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबरनंतर मृत्यूचे प्रमाण कमी होत गेले. जानेवारी व फेब्रुवारीमध्ये मृत्यूची सख्या 40पेक्षा कमी झाली होती. या महिन्यात पहिल्या 15 दिवसांत 19 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. इतर शहरांच्या तुलनेत मृत्यूदर कमी असला तरी पालिकेसमोर हे मुख्य आव्हान असणार आहे.
पालिका आयुक्तांकडून मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रत्येक कोरोना मृत्यूबाबतची दररोज माहिती घेतली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांची व लहान मुलांची अत्यंत काळजी घेण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
नवी मुंबई शहरातील कोरोना मृत्यूदर कमी आहे, परंतु इतर आजार असलेल्यांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इतर आजार असलेल्यांनी, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
RamPrahar – The Panvel Daily Paper