Breaking News

‘राम जन्मला…’ची कथा

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध नवमी हा नऊ दिवसांचा कालावधी संपूर्ण भारतात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सवानिमित्त रामनवमी सप्ताह म्हणून साजरा केला जातो.

रामनवमीच्या निमित्ताने देशभरातील राममंदिरांमध्ये यानिमित्ताने कीर्तन व प्रवचने आयोजित केली जातात. असे उत्साहाचे वातावरण या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसात असते, पण आताच्या आधुनिक युगात कालबाह्य होत चाललेल्या रेडिओ सेवेवर मात्र मराठी संगीतातील अजरामर असे गीतरामायण आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसारित केले जाते.

गीतरामायण या संगीत काव्याची निर्मिती मराठीतील अजरामर गीतकार व महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच गदिमा यांनी केली आहे व गदिमांच्या या काव्याला संगीत साज चढवून ते रसिकांपर्यंत आणण्याचे काम स्वरतीर्थ सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांनी केले.

1953 साली आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली. गीतरामायण हा इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व व संगीतबद्ध केलेला कार्यक्रम 1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 या कालावधीत आकाशवाणीच्या पुणे केंद्राने प्रसारित केला. गदिमांचे सीताराम लाड नावाचे मित्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर कार्यक्रम नियोजक म्हणून होते. नभोवाणीसाठी गदिमांनी काही तरी लिहावे असा त्यांनी गदिमांना आग्रह केला व यातूनच गीतरामायण या महाकाव्याचा जन्म झाला.

रामायणामध्ये महर्षी वाल्मिकी यांनी 28 हजार श्लोकात जी रामकथा लिहिली ती गदिमांनी 56 अजरामर अशा गीतांमधून शब्दबद्ध करण्याचे काम केले. स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती या गीतापासून ते  गा बाळांनो श्रीरामायण या गीतापर्यंत सर्व 56 गीतांना बाबूजींनी संगीतबद्ध करून लोकांसमोर आणले. गदिमांच्या शब्दांमध्ये अजोड अशी एक शक्ती होती व हीच शक्ती बाबूजींनी आपल्या सुमधुर आवाजाने संगीतबद्ध करून रसिकांपर्यंत पोहोचविली.

गीतरामायण लिहून ते संगीतबद्ध होऊन ते आकाशवाणीच्या केंद्रांवर प्रसारित होण्याची सर्व प्रक्रिया शिक्षणाचे माहेरघर व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथे पार पडली. गदिमा गीत लिहून झाल्यावर ते गीत पुढे बाबूजींकडे पाठवत व बाबूजी त्या गीताला स्वरबद्ध करून ते गीत आकाशवाणीवर प्रसारित केले जाई.

1855 ते 1905 या कालावधीत कर्नाटक राज्यातील बाळेकुंद्री या गावचे दत्तात्रेय रामचंद कुलकर्णी या नावाने प्रसिद्ध असलेले श्रीपंत महाराज हे थोर सद्गुरू होऊन गेले. श्रीपंत महाराजांनी गृहस्थाश्रम धर्म स्वीकारून विद्यादानाचे पवित्र असे कार्य केले व सद्गुरू बालमुकुंद महाराज यांच्याकडून आलेला अवधूत सांप्रदाय महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील असंख्य भक्तांपर्यंत सद्गुरूभक्ती, बंधुप्रीती व आत्मशांती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पोहोचविला.

श्रीपंत महाराज हे काही भक्तांसमवेत 1890 सालच्या डिसेंबर महिन्यात त्यांचे बंधू परमपूज्य वामनराव यांच्या एलएलबी परीक्षेसाठी स्वतः श्रीपंत महाराज, गणपतराव मारीहाळकर, अमृतराव राघू अवधूत व अण्णा अक्कोळकर या गुरुबंधूंसह आगगाडीने पुणे येथे आले होते. श्रीपंत महाराजांचे एक गुरुबंधू बाळसुंदर पुणे येथे रेल्वे खात्यात हेडक्लार्क म्हणून कार्यरत होते. त्यांच्या संगतीत गुरुबंधूंनी परस्परांसमवेत दिवस घालविण्याचे ठरविले. त्या दरम्यान श्रीपंत महाराजांचा मुक्काम त्यांचे भाचे शंकर विरूपाक्ष पट्टीहाळ यांच्या पुणे शहरातील वाड्यात होता. तेथे सुमारे आठवडाभर श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा मुक्काम होता या मुक्कामादरम्यान श्रीपंतांचा भजन व बोधाचा वर्षाव चालूच असे. श्रीपंत महाराज बाळेकुंद्री पुणे मुक्कामी ज्या शंकर पट्टीहाळ यांच्या वाड्यात होते. हा वाडा कालांतराने गदिमांनी विकत घेतला व 1950च्या दशकात याच वाड्यातून गदिमांनी गीतरामायणातील गीते लिहिली.

जेव्हा गदिमांनी गीतरामायण लिहावयास घेतले तेव्हा बरीचशी गीते लिहून झाली होती, पण जेव्हा मुख्य रामजन्माचे गीत गदिमांनी लिहावयास घेतले तेव्हा काही त्यांच्या मनासारखे ते तयार होत नव्हते. असेच दिवसामागून दिवस जात होते, पण गदिमांना हवी तशी गीतरचना तयार होत नव्हती. पुणे शहरातील जो शंकर पट्टीहाळ यांचा वाडा गदिमांनी विकत घेतला त्या वाड्यात श्रीपंत महाराजांचा फोटो होता. व त्या फोटोखाली श्रीपंत महाराज बाळेकुंद्री हे पुणे मुक्काम दरम्यान बसले होते ती जागा जतन करून ठेवण्यात आली आहे.

कागदावर बरीच अशी शब्दरचना करून झाली, पण गदिमांच्या ती काही मनासारखी होत नव्हती. काहीशे मनासारखे काव्य तयार होत नसल्याने बैचेन झालेले गदिमा आपल्या पत्नीला म्हणाले की, श्रीपंत महाराज ज्या जागेवर बसले होते तेथे बसून बघावे की काही गीतरचना सुचते का… म्हणून गदिमा श्रीपंत महाराज ज्या जागी बसले होते त्या जागी जाऊन बसले व या जागी बसल्यानंतर गदिमांना जे शब्द सुचले ते गीत असे होते.

॥चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी॥

॥गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती॥

॥दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला॥

॥राम जन्मला गं सखे, राम जन्मला॥

यानंतर हे गीत गदिमांनी सुधीर फडके यांच्याकडे पाठवले व बाबूजींनी त्वरित हे रामजन्माचे गीत संगीतबद्ध करून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून 6 मे 1955 रोजी प्रक्षेपित केले. मिश्र रागातील हे गीत असून ते एकूण 10 मिनिटे व 22 सेकंदांचे आहे.

आज जे गीतरामायणातील रामजन्माचे गीत आहे ते गदिमांनी श्रीपंत महाराजांच्या आशीर्वादाने व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूमधून लिहिले आहे आणि त्यानंतर गदिमांनी तसा उल्लेखदेखील केलेला आहे की, राम जन्मला गं सखे हे गीत श्रीपंत महाराजांच्या आशीर्वादाने लिहिले गेले आहे. पुढे हे रामजन्माचे गीत संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाले.

पुणे शहरातील ज्या वाड्यात गदिमांनी गीतरामायण लिहिले त्या वाड्यात माडगूळकर परिवाराने ह्या महत्त्वाच्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. याच वाड्यात 1890 साली अवधूत संप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचे सुमारे आठवडाभर वास्तव्य होते. आज त्या वाड्यात श्रीपंत महाराजांचे भाचे स्व. शंकर विरूपाक्ष पट्टीहाळ यांनी स्थापन केलेला श्रीपंत महाराजांचा एक फोटो व तुळस आहे. याचबरोबर गदिमांच्या संपूर्ण माडगूळकर परिवाराचे श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री, श्रीपंत घराणे व श्रीपंत संप्रदायाशी एक सलोख्याचे नाते निर्माण झाले असून ते नाते आजही कायम टिकून आहे.

या लेखाच्या निमित्ताने विशेष बाब म्हणजे श्रीपंत महाराजांचे आज भारतासह विदेशात देखील भक्तगण आहेत. 50 वर्षाच्या आपल्या आयुष्यात श्रीपंतांनी अनेक शिष्य घडविले. श्रीपंत महाराजांची पुण्याची खेप वगळता श्रीपंत महाराज 50 वर्षांच्या  कालावधीत बेळगाव परिसर, धारवाड, हुबळी, दड्डी, कुरूंदवाड, मिरज, कोल्हापूर, अक्कोळ वगळता अन्य कोठेही गेले नाहीत.

-आदित्य दीनानाथ कडू

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply