नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा एका धावेने पराभव केला. सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत भिडला. शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना रिषभने चौकार लगावला. रिषभने प्रयत्न केले असले तरी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग पंतवर संतापला आहे. पंतच्या कर्णधारी भूमिकेवर सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे.
सेहवाग म्हणाला, कॅप्टन्सीसाठी रिषभला मी 10 पैकी 5 गुणदेखील देणार नाही. कारण तुम्ही एक कर्णधार म्हणून अशा चुका कधीच करू शकत नाही. जर तुमच्या मुख्य गोलंदाजाला तुम्ही त्याची षटके पूर्ण करू देत नाही. मग तुमची गणिते कुठेतरी चुकतायत हे लक्षात घ्यायला हवे. एका कर्णधाराने त्याच्या जवळच्या गोलंदाजीचे पर्याय शिताफीने वापरायला हवेत.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारा दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा याला बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्याची चार षटके पूर्ण करता आली नाहीत. मिश्राने या सामन्यात तीन षटके टाकली आणि यात ग्लेन मॅक्सवेल सारख्या महत्त्वाच्या फलंदाजाला माघारी धाडले. 20 षटकांच्या अखेरीस मिश्राचे एक षटक शिल्लक राहिले होते. याच मुद्द्यावरून सेहवागने रिषभ पंतच्या कॅप्टन्सीवर नाराजी व्यक्त केली आहे.
एक कर्णधार म्हणून काही रणनीती तुम्हाला शिकाव्याच लागतात. तुमच्याजवळील गोलंदाजीचे पर्याय कसे वापरायचे यात कर्णधाराचे कसब पणाला लागते. गोलंदाजीत बदल व त्यानुसार क्षेत्ररक्षणाची रणनीती यावर कर्णधाराने लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे ठरते, असेही सेहवाग म्हणाला.
Check Also
पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …
RamPrahar – The Panvel Daily Paper