टीम इंडियाला दोनदा राहावे लागणार विलगीकरणात
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि इंग्लंड दौर्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या दौर्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कडक क्वारंटाइन नियमावली तयार केली आहे. टीम इंडियाला भारतातील बायो बबलमध्ये आठ दिवस, तर इंग्लंडला पोहचल्यानंतर 10 दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडला टक्कर देईल. 18 जूनपासून या सामन्याला सुरुवात होईल. भारतातील कोरोनाची स्थिती पाहता बीसीसीआयला कोणताही धोका पत्करायचा नाही. या संदर्भात बीसीसीआयच्या अधिकार्याने सांगितले की, क्वारंटाइन कालावधी दोन टप्प्यांत होईल. 25 मेपासून हे खेळाडू भारतात बायो बबलमध्ये राहतील. त्यानंतर 2 जूनला इंग्लंडमध्ये पोहचल्यानंतर ते तिथे 10 दिवस क्वारंटाइन असतील. चार्टर्ड विमानाने हे खेळाडू एका बबलमधून दुसर्या बबलमध्ये जातील. इंग्लंडला पोहचल्यानंतर ते सराव करू शकतात. यादरम्यान त्यांच्या चाचण्याही होतील. तीन महिन्यांच्या मौठ्या दौर्यामुळे भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली आहे.
वृत्तसंस्था एएनआयच्या मते प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नेतृत्वात 20 सदस्यीय भारतीय संघ 25 मे रोजी मुंबईत येईल. आठ दिवस ते येथे तयार केलेल्या बायो बबलमध्ये राहणार आहेत. या कालावधीत दोन-तीन वेळा त्यांची कोरोना चाचणी होईल.
साऊदम्पटन येथे 18 ते 22 जूनदरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत रंगणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper