Breaking News

मळ्यातील ताज्या भाजीला पसंती

चिरनेरच्या स्थानिक शेतकर्‍यांमध्ये समाधान

उरण : प्रतिनिधी

कोरोना संकटामुळे सामान्य जनतेच्या खाण्यापिण्याच्या गरजांवर मर्यादा आल्या असल्या तरी चिरनेरच्या बाजारात विक्रीसाठी येणार्‍या मळ्यातील ताज्या भाजीला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे. भाजीला मागणी वाढल्याने चिरनेरच्या भाजी उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागात शेतीतील उपलब्ध पाण्यावर मळ्याची शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या शेतमळ्यांमध्ये येणार्‍या उत्पन्नावर त्यांचा घरखर्च चालत असतो, मात्र निसर्गाने साथ दिली तरच त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळते नाहीतर उत्पन्न व खर्च यांचा ताळेबंद जमणे कठीण असते. त्यातच शहरांमधील मार्केटमध्ये दलालांकडून फसवणूक होत असल्याने शेतकर्‍यांच्या पदरी नेहमीच निराशा पडत असते.

सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने बरेच शेतकरी आपल्या मळ्यातील वांगी, मिरची, गवार, तोंडली, दुधी भोपळा, माठ, टॉमेटो, भोपळा, पडवळ, शेवग्याच्या शेंगा, कोबी, पालक, मेथी, दोडका अशी ताजी भाजी गावांमधील बाजारात विकत आहेत. या ताज्या भाजीला लोकांनीही पसंती दिल्याने ही फ्रेश भाजी वाजवी किमतीत लोकांना मिळत आहे.

कोरोनाचा हरविण्यासाठी शरीरात पोषक अन्नद्रव्ये असणे गरजेचे झाले असल्याने या ताज्याभाजीतून अशी पोषक अन्नद्रव्ये उपलब्ध होत असतात. चिरनेरच्या बाजारात अशी भाजी खरेदी करण्यासाठी आजूबाजूच्या गावातून अनेक नागरिक आवर्जून येतात. त्यांना वाजवी किमतीत अशी फ्रेश भाजी मिळत असल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply