काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वक्तव्य
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले खरे, मात्र आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतांतरे असून अनेकदा उघडपणे नाराजीही व्यक्त होत असते. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका मुलाखतीत सरकारबद्दल गंभीर विधान केले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे स्थान या विषयी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची भूमिका मांडली. आम्ही याआधीही अनेकदा सांगितले आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितले आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये, पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा, असे ते मुलाखतीत म्हणाले.
यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका नाना पटोले यांना का यावी. हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. शरद पवार, उद्धव किंवा अन्य नेते असतील त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीने, सहकार्यानेच चालले आहे. याचे विस्मरण तिन्ही पक्षांतील कोणालाही झालेले नाही, असे सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper