नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. या मागणीसाठी 10 जून रोजी ठाणे रायगड, पालघर जिल्ह्यात शासनाला इशारा देण्यासाठी मानवी साखळी तयार करून आंदोलन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नेरुळ मधील शिरवणे विद्यालयात डॉ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षिय कृती समीतीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होत
या वेळी आमदार रमेश पाटील म्हणाले की, स्थानिक प्रकल्पग्रस्थानच्या जमिनी शासनाने सिडकोमार्फत घेतल्यानंतर आज मितीला विमानतळाच्या नामकरणाबाबत भूमिपुत्र संघर्ष करीतच आला आहे. त्यामुळे जोपर्यंत विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही तोवर हा संघर्ष सुरूच राहील.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सुरू झालेली चळवळ आता जिल्ह्या-जिल्ह्यांत पसरत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक, प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्यांच्या संघटना एकत्र आल्याने हा लढा आता व्यापक प्रमाणात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 10 जूनला स्थानिक भूमिपुत्रांद्वारे नवी मुंबई, ठाणे, रायगड ,पालघर या ठिकाणी मानवी साखळी तयार करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतदेखील ठाणे बेलालूर मार्गवर पाच टप्प्यात 21 किलोमीटर लांब मानवी साखळी तयार करून हे आंदोलन करणार असून या वेळी वाहतुकीला कुठल्याही प्रकारे अडथळा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
मानवी साखळी आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधणार असून जर शासनाने नावाबाबत काही निर्णय घेतला नाही तर येत्या 24 जून रोजी ‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त हा लढा व्यापक करण्यासाठी, सिडकोला घेराव घालण्यात व यईल असा इशारादेखील कृती समितीकडून या वेळी देण्यात आला.
या पत्रकार परिषदेस राज्य कोळी महासंघाचे अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य आमदार रमेश पाटील, नवी मुंबई महापालिका क्षेत्र समन्वय समितीचे मुख्य समन्वयक मनोहर पाटील, नवी मुंबई समन्वय समितीचे समन्वयक डॉ. राजेश पाटील, दशरथ भगत, दीपक ह. पाटील, निलेश पाटील, साईनाथ पाटील, शैलेश घाग, सुनील पाटील, मनोज मेहेर, जयेंद्र सुतार, ठाकूर पांडुरंग भोईर, अविनाश सुतार, पंढरीनाथ पाटील, प्रभाकर ठाकूर, सुरेश महादू वास्कर आदी उपस्थित होते.