पेणमधील धोंडपाडा ग्रामस्थांची मागणी
पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील 27 ग्रामपंचायत हद्दीतील उघाड्यांचा लिलाव करण्याबाबतच्या नोटीस खारभूमी विकास विभागाकडून बजावण्यात आल्या होत्या, मात्र उंबर्डे ग्रामपंचायतीमध्ये ही नोटीस पोहोचली नव्हती, त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्यांना लिलावामध्ये सहभाग घेता नव्हता. हा लिलाव पुन्हा करण्याची मागणी धोंडपाडा गावातील शेतकर्यांनी केली आहे.
खारभूमी विकास विभागाच्या पेण येथील कार्यालयात 22 ते 28 जून या कालावधीत तालुक्यातील अनेक गावाच्या उघाड्यांबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यामध्ये दुपारी धोंडपाडा गावातील उघाडीचा लिलाव होता, त्यास तीन शेतकरी उपस्थित होते. अधिकार्यांनी लिलाव प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गावातील उर्वरित शेतकर्यांना ही बाब समजली.
नोटीस न मिळाल्याने आम्ही लिलावापसून वंचित राहिलो आहोत. आमचा हक्क आमच्यापासून दुरावला गेला आहे. त्यामुळे उघाडीचा लिलाव पुन्हा एकदा रितसर व्हावा, अशा मागणीचे पत्र धोंडपाडा गावातील शेतकर्यांनी खारभूमी विकास अधिकारी अर्जुन कोळी यांना दिले आहे.
मागील अनेक वर्षापासून ही उघाडी लिलावाद्वारे ठेकेदाराला दिली जाते. मात्र तालुक्यातील 27 पैकी फक्त आमच्याच ग्रामपंचायतीमध्ये नोटीस कशी पोहोचली नाही. आम्हा शेतकर्यांना या लिलावापासून दूर ठेवण्याचा हा डाव आम्ही खपवून घेणार नाही. या उघाडीचा पुन्हा एकदा रितसर लिलाव व्हावा.
-संजय भोईर, शेतकरी, धोंडपाडा, ता. पेण
धोंडपाडा उघाडीचा लिलावाबाबतची नोटीस ग्रामपंचायतीमध्ये कशी पोहोचली नाही, याबाबत चौकशी करण्यात येईल. शेतकर्यांनी केलेल्या मागणीच्या आधारे ग्रामपंचायतीला पत्र देऊन त्यांच्या उत्तराप्रमाणे पुढील आदेश काढण्यात येतील. दरम्यान, शेतकर्यांच्या जमिनीचे नुकसान झाले तर त्याची भरपाई देण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत.
-अर्जुन कोळी, खारभूमी विकास अधिकारी, पेण