कोलकाता : वृत्तसंस्था
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीकडून दोन पदे सांभाळताना हितसंबंध जोपासले जात असल्याच्या याचिकेबाबत दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या बाजू लिखित स्वरूपात मांडण्याचे आदेश लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी दिले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) गांगुलीची पाठराखण करण्यात येत असून, हितसंबंधाचा वाद हा सोडवता येणे शक्य असल्याचे म्हटले आहे.
भासवती शांतुआ, अभिजीत मुखर्जी आणि रणजीत सील या बंगालच्या तीन चाहत्यांनी गांगुलीविरोधात दावा केला आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवताना गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या सल्लागाराच्या भूमिकेत कार्यरत आहे. त्यामुळे गांगुलीकडून हितसंबंध जोपासले जात असल्याबाबत या तिघांनी आक्षेप घेत बीसीसीआयकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी लवाद अधिकार्यांकडे हे प्रकरण सोपवले आहे. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उभय पक्षकारांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले असून, त्यानंतरच ते निकाल जाहीर करणार आहेत.