गयाना ः वृत्तसंस्था
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत अंगकृष रघुवंशी आणि राज बावा यांच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने दुबळया युगांडावर 326 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विजय आहे. अंगकृष रघुवंशीने (144) धावा केल्या, तर राज बावाने 108 चेंडूंत नाबाद (162) धावा तडकावल्या. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. भारताने निर्धारीत 50 षटकांत पाच बाद 405 धावांचा डोंगर रचला. अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा हा दुसरा सर्वोच्च स्कोर आहे. यापूर्वी भारताने 2004च्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 425 धावांचा डोंगर उभारला होता. भारताने दिलेल्या विशाला लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाचा डाव अवघ्या 79 धावांत आटोपला. त्यांचे पाच फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परतले. दोघांनीच फक्त दोन आकडी धावा केल्या. यात कॅप्टन पास्कलने सर्वाधिक (34) धावा केल्या. फलंदाजीत विशेष चमक न दाखवू शकलेल्या कॅप्टन निशांत सिंधूने गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या. अन्य गोलंजदाजांनी त्याला चांगली साथ दिली. अवघ्या 20 षटकांत युगांडाचा डाव संपुष्टात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper