पनवेल : वार्ताहर
तळोजा रेल्वे फाटकातील पादचारी भुयारी मार्गातील दिवे बंद असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावे लागत आहेत. दरम्यान, तळोजा येथील भुयारी पादचारी मार्गातील विद्युत दिवे बंद असल्याने रात्री मार्गक्रमण करताना अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हे बंद दिवे सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
दिवा-पनवेल मार्गावरील तळोजा रेल्वे फाटकवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासनाने वाहनांसाठी 15 मीटर लांबीचा तर पादचार्यांसाठी तीन मीटर अंतराचा असे दोन भुयारी मार्ग उभारले आहेत. रेल्वे प्रशासनाने मागील वर्षी 9 नोव्हेंबर रोजी वाहनांसाठी तळोजा रेल्वे फाटकवर भुयारी मार्ग सुरू केला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने काही दिवसांनी पादचार्यांसाठी उभारलेल्या भुयारी मार्गात विद्युत दिव्यांची सोय उपलब्ध करून दिली, मात्र हे विद्युत दिवे गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे पादचार्यांना तळोजा रेल्वे फाटकवर जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावा लागत आहे.
पादचारी भुयारी मार्गातील दिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी पायी जाणार्या महिला, मुले-मुली आणि नागरिकांना मोबाइलचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषतः पादचारी मार्ग पार करण्यासाठी पाच मिनिटे लागतात. तळोजा रेल्वेफाटकवरील भुयारी मार्गातील दिवे व वायर यांची चोरी झाली आहे. दरम्यान, तळोजा रेल्वे फाटकातील पादचारी भुयारी मार्गातील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी काही गर्दुल्ल्यांकडून अनुचित प्रकारही घडू शकतो. संबंधित अधिकार्यांनी तळोजा रेल्वेफाटकातील पादचारी भुयारी मार्गातील बंद असलेल्या विद्युत दिवे सुरू करावे, अशी मागणी होत आहे.