Breaking News

माणगाव वडघर येथे नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा

माणगाव : प्रतिनिधी

आशयानुसार कवितेचे सादरीकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन कोमसाप जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांनी माणगाव तालुक्यातील वडघर येथे केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कोमसाप उरण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 30) वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे सुधीर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. एल. बी. पाटील यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले. कोमसापचे दक्षिण रायगड अध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा समन्वयक दुर्ग अभ्यासक सुखद राणे, गणेश कोळी, अ‍ॅड. गोपाळ शेळके, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोमसापच्या उरण शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. एल. बी. पाटील यांनी आपली रचना सादर केली. हेमंत बारटक्के यांनी सूत्रसंचालन केले. अभिजात मराठी विचार या विषयावर दुसरे सत्र घेण्यात आले. शिवव्याख्याते प्रशांत देशमुख व कवी, नायब तहसीलदार संजय माने यांनी त्यात विचार व्यक्त केले. गणेश कोळी यांनी सूत्रसंचालन केले. बोली भाषेतील कविता या विषयावर झालेल्या तिसर्‍या सत्रात अरुण इंगवले, संध्या देवकर, नामदेव बरतोड यांनी सहभाग घेतला. डॉ. राजेंद्र राठोड सूत्रसंचालन केले.  कविता कशी स्फुरते या विषयावरील सत्रात कवयित्री ज्योत्स्ना राजपूत, कवी गंगाधर साळवी यांनी भाग घेतला तर अजित शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. खुल्या कविसंमेलनात 20 कवींनी सहभाग घेतला. समारोप सत्रात जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम यांनी मनोगत व्यक्त केले. हेमंत बारटक्के यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply