Breaking News

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

कर्जत तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले

कर्जत : बातमीदार

सुरुवातीपासून हुलकावण्या देणार्‍या पावसाने जून महिन्याच्या अखेरीस दमदार सुरुवात केल्याने कर्जत तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे. भाताची रोपे तयार होण्यासाठी आवश्यक असा पाऊस सध्या होत असल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.दरम्यान, भातशेतीसाठी गरजेचे असलेली पाणी शेतात दिसू लागल्याने बळीराजा समाधानी आहे.

कर्जत तालुक्यात सुमारे 9600 हेक्टर जमिनीवर भातशेती केली जाते. तालुक्याच्या काही भागात उन्हाळी भातशेतीही केली जाते. दरवर्षी जून महिन्यात सात तारखेला पाऊस सुरू होतो. यंदा जून महिन्याच्या 10 तारखेनंतर कर्जत तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. यंदा चांगला पाऊस होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यातच  दिवसातून एकद-दुसरी हलक्या पावसाची सर येत असल्याने बहुतांश शेतकर्‍यांनी भाताची पेरणी केली होती. भात रोपे वाढू लागली होती. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने भात रोपे वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू होती. जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. काही शेतकरी भात रोपे वाचविण्यासाठी ओढ्यावर पंप बसवून शेतात पाणी घेत होते. मात्र जून महिन्याच्या अखेरीस कर्जत तालुक्यात मोसमी पावसाने दमदार सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे.

कर्जत तालुक्याच्या बहुतांशी भागात मागील तीन दिवस साधारण 45 मिलीमीटर पाऊस होत आहे. त्यामुळे भाताची रोपे सुकण्याची स्थिती निर्माण झाली होती, ती दूर झाली असून बळीराजाची शेतीच्या कामांची लगबग वाढली आहे.

2021 मधील एकूण पाऊस – 3397 मिलिमीटर

आजच्या तारखेपर्यंत 2021मध्ये 839 मिलिमीटर

यावर्षीचा सरासरी पाऊस – 279 मिलिमीटर

यावर्षीचा सर्वाधिक पाऊस -51 मिलिमीटर

Check Also

नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष

नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन …

Leave a Reply