दहशतवाद्यांच्या घुसखोरीची शक्यता तटरक्षक दलही दक्ष

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर दहशतवाद्यांनी आणखी एक मोठा कट रचल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रीलंकेच्या अधिकार्यांनी इसिसचे 15 दहशतवादी लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली असून केरळ किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
श्रीलंकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी 23 मे रोजी एक अलर्ट जारी केला आहे. इसिसचे 15 दहशतवादी बोटीतून लक्षद्वीपच्या दिशेने जात असल्याची माहिती यामध्ये देण्यात आली, तसेच या दहशतवाद्यांनी मोठा कट रटल्याचेही यामध्ये सांगण्यात आले. या अलर्टनंतर गुप्तचर यंत्रणेने त्वरित पावले उचलत केरळ पोलीस आणि तटरक्षक दलाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत, तसेच मच्छीमारांनाही अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार असा अलर्ट अनेकदा देण्यात येतो, परंतु या वेळी दहशतवाद्यांच्या संख्येसह अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळेच तातडीने केरळ किनारपट्टीची सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मच्छीमार आणि समुद्रात जाणार्या अन्य लोकांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पालक्काड येथील एका तरुणाला दहशतवादी कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. रियास अबूबकर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याने तपासादरम्यान श्रीलंकेतील हल्ल्याचा मास्टरमाइंड जहरान हाशिम याच्याकडून प्रेरणा घेतल्याचे कबूल केले होते.
श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर इसिसचे दहशतवादी भारतात हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासादरम्यान समोर आली होती. नुकताच इराक आणि सीरियामधून इसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. श्रीलंकेत 21 एप्रिल रोजी आठ साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. यामध्ये 250पेक्षा अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.