Breaking News

भाजपतर्फे सरदार @150 एकता पदयात्रा

विविध उपक्रमांबाबत पत्रकार परिषदेत माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे पहिले उपपंतप्रधान, लोहपुरुष आणि एकीचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरदार @150 एकता पदयात्रा आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती कार्यक्रम जिल्हा संयोजक व जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांनी शनिवारी (दि.9) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांच्यासमवेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती कार्यक्रम भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, जिल्हा सहसंयोजक सुशिल शर्मा उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘विकसित भारत 2047’चा संकल्प घेऊन देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असून त्या अनुषंगाने वाटचाल सुरु आहे. ‘एक भारत, अखंड भारत’ या भावनेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांचे व्यक्तिमत्त्व आणि दृढ इच्छाशक्ती युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. याच भावनेतून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर सरदार @ 150 एकता पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संयोजनाखाली विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ही जयंती साजरी करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत उत्तर रायगड प्रशासकीय जिल्हा स्तरावर तीन दिवसीय एकता पदयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत दररोज किमान 8 ते 10 किलोमीटरचा प्रवास केला जाईल. यात्रेदरम्यान ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला बळकटी देण्यासाठी विविध कार्यक्रमे होणार आहेत.
एकता पदयात्रेत एक हजार लोकं सहभागी होतील त्यामध्ये 150 भाजपचे कार्यकर्ते, एनएसएस व एनसीसीचे विद्यार्थी तसेच विविध संस्था संघटनांचा सहभाग असणार आहे. या पदयात्रेच्या समारोपात सामाजिक दृष्टिकोनातून पथनाट्य सादर होणार आहे, असे अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांनी सांगितले.
काल संपूर्ण देशात एकता दौड मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विशेषत्वाने पोलीस विभागाने याचे आयोजन केले आणि त्यामध्ये विविध संघटनांनी सहभाग घेतला होता. सरदार @ 150 एकता पदयात्रा तीन दिवस असणार आहे त्यामुळे याचे आयोजन चांगल्याप्रकारे व्हावे यासाठी नियोजन केले जात असून 4 नोव्हेंबरला जिल्हा बैठकीत या पदयात्रेच्या तारखेच्या निश्चिती केल्या जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले. तसेच या पदयात्रेत नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply