Breaking News

भगवद्गीता आपल्या संस्कृतीचा आत्मा -आमदार प्रशांत ठाकूर

स्पर्धेचे पारितोषिक वितरण; समीरा गुजर-जोशी यांचे प्रकट व्याख्यान

पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्रीमद्भगवद्गीतेत केवळ धार्मिक उपदेश नाही, तर जीवन जगण्याची कला सांगितलेली आहे. कर्तव्य, कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचा सुंदर समतोल गीतेत दिसतो. कर्तव्य करताना फलाची अपेक्षा न ठेवणे, धैर्याने संकटांना सामोरे जाणे आणि स्वतःचा धर्म ओळखणे हे संदेश आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भगवद्गीता आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 21) येथे केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे सप्टेंबर महिन्यात श्री विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे श्रीमद्भगवद्गीता पाठ महायज्ञ झाला. या संस्कारमय कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्रीमद्भगवद्गीता पठण स्पर्धेची घोषणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. विशेष म्हणजे पनवेलमध्ये प्रथमच आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि समीरा गुजर-जोशी यांचे प्रकट व्याख्यान शहरातील गोखले सभागृहात झाले. त्या वेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ता सुप्रसिद्ध अभिनेत्री व सूत्रसंचालिका समीरा गुजर-जोशी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी नगरसेवक अजय बहिरा, राजू सोनी, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका प्रिती जॉर्ज, सुलक्षणा टिळक, संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर, निलांबरी जोशी, जुई चव्हाण, गुरुकुलम न्यास अध्यक्ष मंजिरी फडके, अ‍ॅड. अमित चव्हाण, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, रूपेश नागवेकर, प्रितम म्हात्रे, विनायक मुंबईकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चा शहराध्यक्ष हिमेश बहिरा यांच्यासह विद्यार्थी, युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी भगवद्गीतेचे महत्त्व आपल्या भाषणातून मांडले. संस्कृत भाषा ज्ञानाची आणि संस्कृतीची आहे. आपल्या देशातील भाषा आणि साहित्य देशाचे वैभव आहे, त्या अनुषंगाने आपली संस्कृती वृद्धिंगत होत राहणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे नमूद करून भगवद्गीतेचे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे हा मूळ उद्देश या स्पर्धेचे होता हे त्यांनी अधोरेखित केले. या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद ऊर्जा देणारा आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजप पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांनी विशेष मेहनत घेतली असल्याचे नमूद करून यापुढेही ही स्पर्धा अखंडपणे सुरू राहिली पाहिजे यासाठी आपण सारे कायम प्रयत्नशील राहू या, असे आवाहन त्यांनी केले तसेच आयोजन समितीमधील सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले.

  • भारत बुद्धी, ज्ञान आणि मूल्यांचा देश ः समीरा गुजर-जोशी
    या वेळी वक्ता म्हणून बोलताना समीरा गुजर-जोशी यांनी म्हटले की, आपली संस्कृती ही आपल्या ओळखीचा आत्मा आहे आणि ती कधीही विसरता कामा नये. भारत हा बुद्धी, ज्ञान आणि मूल्यांचा देश असून येथे शब्दांचे उच्चार, त्यांचा अर्थ आणि विचारांना विशेष महत्त्व दिले जाते. भारतीय संस्कृती जगभरात तिच्या महान परंपरा, तत्त्वज्ञान आणि जीवन मूल्यांमुळे ओळखली जाते. यशस्वी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनासाठी भगवद्गीतेचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवद्गीतेत सांगितलेला कर्मसिद्धांत माणसाला कर्तव्यनिष्ठ राहून फळाची अपेक्षा न करता कार्य करण्याची प्रेरणा देतो. हा सिद्धांत व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि जीवनातील यशासाठी दिशादर्शक ठरतो. भारतीय संस्कृतीचे जतन आणि भगवद्गीतेतील विचारांचा अंगीकार केल्यास समाज अधिक सुसंस्कृत, विचारशील आणि मूल्याधिष्ठित बनेल, असे सांगून जो घटक संपूर्ण समाजाला एकत्र बांधून ठेवतो, मूल्ये, नैतिकता आणि एकोप्याची भावना निर्माण करतो, त्याला खर्‍या अर्थाने धर्म म्हणता येते, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी साने गुरूजी, विनोबा भावे, बहिणाबाई यांची उदाहरणे देत भावी व युवा पिढीला सरळ सोप्या भाषेत संवादातून मार्गदर्शन केले तसेच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त केले.
  • विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
    खुला गट – प्रथम क्रमांक श्रुती संदीप वीरकर, द्वितीय नीता लक्ष्मण भुजबळ आणि निवेदिता मधुकर नाईक, तृतीय शैला शरदराव कन्नडकर; शालेय गट इयत्ता तिसरी व चौथी – प्रथम भाविका ओमकार कुलकर्णी, द्वितीय साई तुळशीराम गांडाळ, तृतीय शिवम निवास डांगरकर; इयत्ता पाचवी ते सातवी – प्रथम राधा अंबरीश सहस्रबुद्धे, द्वितीय अथश्री जोशी, तृतीय ईश्वरी कट्टी; इयत्ता आठवी ते दहावी – प्रथम परिभूषण कुलकर्णी, द्वितीय आभा टिळक, तृतीय विद्यारण्य सचिन गोंधळी.
    खुला गटातील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकास 21 हजार रुपये, द्वितीय 18 हजार रुपये आणि तृतीय 15 हजार रुपये; शालेय गटातील इयत्ता तिसरी व चौथीमधील प्रथम क्रमांकास पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय दोन हजार रुपये; इयत्ता पाचवी ते सातवीमधील प्रथम क्रमांकास 11 हजार रुपये, द्वितीय आठ हजार, तृतीय पाच हजार रुपये; तर इयत्ता आठवी ते दहावीतील प्रथम क्रमांकास 15 हजार रुपये, द्वितीय 11 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला आठ हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप होते. त्याचबरोबर प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply