नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून मोठे यश मिळवणार्या भाजपने तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणार्या तृणमूलचे दोन आमदार आणि 50 नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. दिल्लीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.
2017मध्ये भाजपमध्ये सामील झालेले तृणमूलचे माजी नेता मुकुल रॉय यांचे सुपुत्र शुभ्रांशू रॉय यांच्यासह तीन आमदारांनी भाजपात प्रवेश केला. त्यातील एक आमदार सीपीएमचे आहेत. शुभ्रांशू रॉय बिजपूरचे आमदार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त विष्णुपूरचे तृणमूलचे आमदार तुषार कांती भट्टाचार्य, हेमताबादचे माकपचे आमदार देवेंद्र रॉय यांनीही भाजपात प्रवेश केला.
लोकसभेतील यशानंतर भाजप येथे ममता बॅनर्जींना आव्हान देण्यासाठी आक्रमक झाला आहे. काचरापारा महापालिकेचे 17 नगरसेवकही भाजपात सहभागी झाले. परिणामी या 26 नगरसेवकांच्या महापालिकेत भाजप सत्तेत आला आहे. याव्यतिरिक्त आणखी दोन महापालिकांवर भाजपने कब्जा केला. तिन्ही महापालिकांचे एकूण 50 नगरसेवक भाजपात आले.