Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर समाजसेवेतील हिरा -आमदार रविशेठ पाटील

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूट कोर्टचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील एक अनमोल हिरा आहेत. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांनी उभे केलेले कार्य आणि निर्माण केलेली सामाजिक बांधिलकी हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. त्यांची दूरदृष्टी, ध्येयधोरण आणि सक्षम नेतृत्वाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने केवळ पनवेल परिसरातच नव्हे, तर रायगड, नवी मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी काढले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन बुधवारी आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते आणि संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात झाले. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार महेश बालदी, संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, शकुंतला ठाकूर, ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, महापौर नितीन पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, महापालिकेचे सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, संस्थेचे संचालक व नगसरेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनराज विसपुते, जी.के. गुजर चॅरिटेबल ट्रस्टचे व्हाईस चेअरमन इंद्रजीत गुजर, वीरेंद्र गुजर, संस्थेचे सचिव डॉ.एस.टी. गडदे, संचालक अनिल भगत, संजय भगत, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, ॲड. राहुल घरत, स्वप्नील ठाकूर, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, व्हीडीआयपीएलचे वैभव देशमुख, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.पाटील बीसीटी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य सानवी देशमुख यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पालक, विद्यार्थी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आमदार रविशेठ पाटील यांनी पुढे बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. ते म्हणाले, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. समाजाच्या सेवेसाठीच त्यांचा जन्म झाला आहे. त्यांनी उभारलेली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांच्या कर्तृत्वाला दिशा देणारी संस्था आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला आणि विविध क्षेत्रांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकविला आहे. राष्ट्रकुल स्पर्धांपासून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण कार्याचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षणासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नेतृत्व आणि संस्थेची कार्यसंस्कृती आहे. त्यामुळे या संस्थेची भरारी ही रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
राज्यात अनेक शैक्षणिक संस्था आहेत, मात्र संस्था उभी करणे आणि ती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे यात मोठा फरक आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने हा फरक आपल्या कामातून सिद्ध केला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि समाजाभिमुख कारभार सुरू असून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे, असे सांगून आमदार रविशेठ पाटील पुढे म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समाजसेवेचा आणि विकासाच्या विचारांचा वारसा त्यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर समर्थपणे पुढे नेत आहेत. सत्तेची अपेक्षा न ठेवता समाजाच्या हितासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि परिसराच्या विकासासाठी ठाकूर कुटुंबीय सातत्याने काम करीत आहेत. त्यामुळे या कुटुंबाचे सामाजिक योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
सर्वांच्या सहकार्याने प्रगती -लोकनेते रामशेठ ठाकूर
यावेळी अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत संस्थेच्या प्रगतीचे श्रेय सर्व सहकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, हितचिंतक आणि युवकांच्या सामूहिक योगदानाला दिले. हे सर्व माझ्या एकट्याचे काम नाही. सर्वांच्या सहकार्यामुळेच काम करण्याचा हुरूप, ऊर्जा आणि ताकद मिळाली. सहकाऱ्यांचे सहकार्य आणि युवकांची ताकद हीच संस्थेच्या प्रगतीची खरी शक्ती आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
संस्थेने आजवर अफाट प्रगती साधत शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून संस्थेच्या विविध विद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. केंद्र व राज्य शासनाचे विविध पुरस्कार संस्थेच्या विद्यालयांना प्राप्त झाले आहेत. हे यश विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि हितचिंतक यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
कर्मवीर अण्णा आणि जनार्दन भगतसाहेबांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून संस्थेची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या आशीर्वादाने समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि उत्तम शैक्षणिक वातावरण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने केला जात आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सक्षम आणि दूरदृष्टीचे नेतृत्व, तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने विकासाभिमुख नेतृत्व लाभले असल्याचे नमूद करताना त्यांच्या नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संस्थेच्या शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता आणि कार्यपद्धतीवर समाजाचा दृढ विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच विद्यार्थी संस्थेच्या नावावर विश्वास ठेवून प्रवेश घेत आहेत, हीच आपल्या कार्याची खरी पावती आहे, असे त्यांनी सांगितले.
यापुढील काळातही संस्थेच्या वाटचालीत प्रेम, आपुलकी, विश्वास आणि सहकार्याचे वातावरण कायम ठेवत शिक्षण क्षेत्रात नवनवीन आदर्श निर्माण करण्याचा संकल्प लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला तसेच संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
संस्थेने गुणवत्तेचा ठसा उमटवला -आमदार प्रशांत ठाकूर
प्रास्ताविकपर भाषणात बोलताना संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने विविध क्षेत्रांत अनेक मानांकने प्राप्त करत सातत्याने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. संस्थेच्या सर्व शाखांमधून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याने संस्थेला राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. दर्जेदार शिक्षणासोबतच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही संस्था उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेचे प्रशासकीय कार्यालयही त्याच दर्जाचे आणि आधुनिक असावे, अशी संकल्पना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मांडली होती. त्यानुसार या प्रशासकीय कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली संस्था वेगाने वाटचाल करत असून १३ मे रोजी उलवे येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.
यावेळी शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक व नगरसेवक परेश ठाकूर यांनी मानले.
अशी आहे संस्थेची वाटचाल
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही रायगड नवी मुंबईतील एक नामांकित शैक्षणिक संस्था असून तिची स्थापना १ जानेवारी १९९२ रोजी झाली. स्व. जनार्दन भगतसाहेबांचे समाजहिताचे विचार, शिक्षणाविषयीची तळमळ आणि त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा पुढे नेत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. स्थापनेपासूनच संस्थेने गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि संस्कारक्षम शिक्षणाला प्राधान्य देत शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने वाटचाल केली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळाच्या प्रवासात संस्थेने शिक्षणाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय विस्तार केला असून आज संस्थेच्या अंतर्गत १८ शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. विविध स्तरांवरील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण, आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे. शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, या विचारातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आजही आपल्या शैक्षणिक वाटचालीत पुढे जात आहे. स्व. जनार्दन भगतसाहेबांचे विचार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांची दूरदृष्टी यांचा वारसा जपत गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम पिढी घडविण्याचे ध्येय संस्थेने कायम ठेवले आहे.
रायगड जिल्ह्यातील वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण लक्षात घेऊन विधी शिक्षणाची गरज ओळखत संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून शैक्षणिक वर्ष २००९-१०मध्ये श्रीमती भगुबाई चांगू ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता व मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात सुसज्ज इमारत, प्रशस्त वर्गखोल्या, समृद्ध ग्रंथालय व मूट कोर्ट हॉल यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. क्लिनिकल लीगल एज्युकेशन, प्रात्यक्षिकाधारित शिक्षण तसेच न्यायाधीश, ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक कायदेविषयक ज्ञान मिळते. अनुभवी प्राध्यापकवर्गाच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक ज्ञानासोबत आत्मविश्वास, तर्कशक्ती, संवादकौशल्य व सामाजिक बांधिलकी विकसित केली जाते. गुणवत्तापूर्ण व व्यावहारिक विधी शिक्षणातून सक्षम भावी कायदेपंडित घडविण्याचे कार्य महाविद्यालय सातत्याने करत आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गौरव संदेश
पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील यांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणे आवश्यक असल्याने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्याचा चित्रफित संदेशाद्वारे गौरव करीत शुभेच्छा दिल्या. ही चित्रफीत यावेळी प्रदर्शित करण्यात आली.
ना. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, नमस्कार माझे परममित्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला त्यांनी निमंत्रण दिल्यानंतर मी नाही म्हणू शकत नाही; त्याप्रमाणे आजच्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यक्रमाला मी हो म्हटले, पण देशातलं एक मोठं नाव शिक्षण क्षेत्रातलं डॉ.डी.वाय. पाटील यांचे काल अचानक निधन झाले. शिक्षण, सहकार, आरोग्य क्षेत्रातील त्यांचे भरीव व मोठे असून देशाच्या तीन राज्यांचे ते राज्यपाल राहिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी ज्या कोल्हापूरचा त्या कोल्हापूरचे ते आहेत. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला मला पोहचावेच लागेल आणि म्हणून फार आधीपासून हो म्हणूनही मला अचानक कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही आणि त्यामुळे मी या संदेशातून माझ्या भावना व्यक्त करतो आहे.
कार्यक्रमाला उपस्थित माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना मी एक राजकीय नेता म्हणून ओळखत होतो, पण जसे जसे मी त्यांच्याजवळ गेलो तर माझ्या लक्षात आले की, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम डोंगराएवढे मोठे आहे. असे आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी आणि उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार! संस्थेच्या या कार्यक्रमांमध्ये आज खूप गोष्टी होणार आहेत. विद्यार्थ्यांचे कौतुक, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबद्दलची भविष्यातील काही दिशा मांडली जाणार आहे. स्व. जनार्दन भगतसाहेबांचा ‌‘स्वतः घडा आणि दुसऱ्यांना घडवा‌’ हा संदेश आणि ‌‘विद्या विनयेन शोभते‌’ हे बोधवाक्य आजही या संस्थेच्या प्रत्येक उपक्रमातून अधोरेखित होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर हे विद्या विनयेन शोभते याचे मोठे प्रतिकच आहे, त्यांच्या अंगी किती नम्रता आहे. १९९२मध्ये सुरू केलेल्या या संस्थेने शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे उल्लेखनीय कार्य केले आहे. १८ शाखांतून २१ हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हजारावर अधिक शिक्षक व कर्मचारी ज्ञानदान करीत आहेत. ही वाटचाल संस्थेवर समाजाचा विश्वास असल्याची साक्ष आहे. स्पर्धा खूप वाढतेय, त्यातून एवढे विद्यार्थी संख्या टिकवून आहे आणि हे सोपे नाही. नॅकचे ए प्लस प्लस मानांकन, विविध राष्ट्रीय पुरस्कार, आधुनिक शैक्षणिक सुविधा देणारी ही संस्था नवी मुंबई आणि रायगड परिसरातील एक विश्वासार्ह शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. विशेषतः भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाने गेल्या १६ वर्षात साडेसात हजार अधिक विधीज्ञ घडविले आहेत. न्यायव्यवस्था, प्रशासन, कॉर्पेट क्षेत्र आणि सार्वजनिक जीवनात या संस्थेचे विद्यार्थी उल्लेखनीय योगदान देत आहे. मूट कोर्ट, कायदेशीर मदत शिबिरे, संशोधन, इंटरनॅशनल आणि संविधानिक मूल्यांवर आधारित शिक्षण ही महाविद्यालयाची खरी ताकद असून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, कौशल्य संशोधन आणि विकसित करण्यावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
ना. पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने उच्च शिक्षण जागतिक दर्जाचे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. अशा परिवर्तनाच्या प्रवासात जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेसारख्या संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, पदवी मिळवणे हे आयुष्याचे अंतिम ध्येय नाही, तर समाजासाठी उपयुक्त, जबाबदार आणि मूल्यनिष्ठ नागरिक बनणे हे शिक्षणाचे खर उद्दिष्ट आहे. संविधानातील न्याय, समता, स्वातंत्र, आणि बंधुत्व जपत आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करा. जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या सर्व पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! संस्थेने भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समाजसेवेची परंपरा अधिक उंचीवर न्यावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊ मी माझं बोलणं संपवतो.. जय हिंद, जय महाराष्ट्र!

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply