Breaking News

चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणे आम्हाला भोवले -रवी शास्त्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीत अव्वल कामगिरी करणारा भारतीय संघ उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या मार्‍यासमोर ढेपाळला. भारताचे दिग्गज फलंदाज मोक्याच्या क्षणी झटपट माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणे आम्हाला भोवल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मान्य केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

शास्त्री म्हणाले की, होय, मधल्या फळीत आम्हाला एका अनुभवी फलंदाजाची उणीव भासली. आता या गोष्टीचा विचार भविष्यासाठी करायचा आहे. चौथ्या क्रमांकाची जागा भारतीय संघासाठी नेहमी डोकेदुखी ठरली आहे. लोकेश राहुल, विजय शंकरसारखे खेळाडू यंदाच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी होते, मात्र दुखापतीमुळे सगळे चित्र पालटले आणि नंतर जे काही घडले त्यावर नियंत्रण ठेवणे हातात नव्हते.

भारतीय संघाच्या कामगिरीचा आपल्याला अभिमान असल्याचेही शास्त्री यांनी आवर्जून नमूद केले. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाने सर्वोत्तम खेळ केला आहे ही गोष्ट एका सामन्यातल्या खराब कामगिरीमुळे नाकारता येणार नाही. विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात अर्ध्या तासात आम्ही वाईट खेळलो, मात्र या गोष्टीचा विचार आता करण्यात काहीच अर्थ नाही. या पराभवाचे प्रत्येक खेळाडूला वाईट वाटणे साहजिक आहे, पण संघातील प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ केला आहे, असे त्यांनी सांगितले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply