उरण : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वच ठिकाणी बाजार व येणंजाणं बंद झाले आहेत. यामुळे काही आदिवासी वाड्यांना याचा फटका बसत त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. अशाच 20 आदिवासी कुटूंबाना शिक्षक कौशिक ठाकूर व महेश गावंड यांनी अन्नधान्य वाटप केले. यामुळे या आदिवासी बांधवांच्या चेहर्यावर हास्य उमटल्याचे पाहून मानसिक समाधान वाटल्याचे या शिक्षकांनी सांगितले.
सोमवारी (दि. 30)संध्याकाळी बेलवाडी वरील गणेश कातकरी याने शिक्षक कौशिक ठाकूर यांना फोन करून गेली दहा-बारा दिवस झाले घरात काही नाही, ना करवंदा, रांजणे, आंबे, फाटी विकायला जाता येत नाहीत. पोरा उपाशी आहेत. काहीतरी बघा असे कळकळीने सांगितले.
त्यानंतर क्षणाचीही उसंत न घेता कौशिक ठाकूर यांनी आपला जिवलग मित्र महेश गावंड यांना आदिवासी बांधवांचे गार्हाणे कानावर घातले. त्यानंतर काही वेळातच या दोघांनी कोणाकडूनही मदत न घेता स्वखर्चाने रात्रीच त्यांनी सांगितलेले साहित्य त्यामध्ये तांदूळ, साखर, तेल, हळद-मसाला, डाळ, कडधान्य, कांदे-बटाटे पॅक करून मंगळवारी (दि. 31) सकाळी वाडीवर जाऊन प्रत्येक घरात वाटप केले. या नंतर त्यांच्या चेहर्यावरील हास्य पाहून समाधान वाटल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त करीत यापुढेही आदिवासी बांधवांना मदतीचा हातभार देऊ असे सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper