आमदार गणेश नाईक यांची मागणी
नेरुळ : बातमीदार – नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीत सर्वच मार्केटमध्ये कोरोना रुग्णांची वाढ सातत्याने होत असल्याने हे मार्केटच बंद करावे, अशी मागणी ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री, पणनमंत्र्यांना पत्र देऊन केली आहे.
नवी मुंबई वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मुंबई व उपनगरातील अन्नधान्याची गरज भागवली जाते. परंतु मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु असल्यामुळे बाजारात मालाची आवक मात्र ठरलेल्या आवकीपेक्षा दुपटीने होत असल्यामुळे सुरक्षिततेचे नियम पूर्णपणे पाळले जात नाहीत. बाजारातील अनेक व्यापारी, माथाडी, मापाडी कामगार, सुरक्षा अधिकारी व काम करणारे घटक यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या व्यापार्यांना व कामगारांना कोरोनाची बाधा झाली, त्यांच्या संपर्कात आलेल्या सहकार्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. परंतु बाजार समिती सुरु असल्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथूनच कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढ असल्याने अन्नधान्य, कांदा-बटाटा, मसाला, फळ व भाजी मार्केट बंद करण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत देखील बाजार समितीमध्ये अभिकारी, कर्मचारी, माथाडी, मापाडी कामगार व लहान-मोठे घटक कार्यरत आहे. आता बाजारातील कोरोनाचा प्रसार इतक्या वेगाने होऊ लागला आहे की, सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. बाजारातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे एपीएमसीमध्ये कार्यरत असलेल्या बाजार समितीच्या कर्मचार्यांकडून इतक्या तणावाच्या वातावरणात काम करण्यापेक्षा नोकरी नको, आपल्यासोबत आपल्या कुटुंबाच्या जिवाशी खेळ का करावा अशी भूमिका घेतली जात असून बाजार समितीच्या कर्मचार्यांनी स्वेच्छानिवृत्ती अर्ज दाखल केले आहेत, यावरुन बाजार परिसरामध्ये किती गंभीर परिस्थिती निर्माण झाली हे स्पष्ट होत आहे.
नवी मुंई शहरात वाटणाच्या कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ रोखण्याकरिता तातडीने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याबाबतच्या सूचना संंधितांना द्याव्यात अशी मागणी आ. नाईक यांनी केली आहे.