कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात कोरोनाचा ससेमिरा सुरूच आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापारीवर्गाने
सोमवारपासून (दि. 29) तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमधून फक्त वैद्यकीय सुविधांना वगळण्यात आले आहे.
तालुक्यात सुरुवातीला कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, मात्र काही दिवसांनी कोरोनाने तालुक्यात शिरकाव केला. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कर्जत शहराबरोबरच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. शहरालगतच्या गावांतही लक्षणीय रुग्ण आढळत आहेत. अल्पावधीतच शतक पार करून कोरोनाची वेगाने वाटचाल सुरू आहे. परिणामी कोरोनाला रोखण्यासाठी कर्जतच्या व्यापारी फेडरेशनने व्यापारीवर्गाची तातडीची सभा बोलावली होती.व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष मयूर जोशी, सचिव राजेश ओसवाल, सुमेश शेट्ये, मोहन ओसवाल, रणजित जैन, मदन परमार, महेंद्र बोडके, विक्रम ओसवाल, मंगल परमार, रामकिशोर गुप्ता, आशिष शहा, अनुप मावळे, शेखर बोराडे, किरण ओसवाल आदी प्रमुख व्यापारी या वेळी उपस्थित होते. या वेळी सोमवारपासून तीन दिवस कर्जत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी बंद पाळताना जीवनावश्यक सेवा म्हणजे किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीपाला, औषधांची दुकाने, दवाखाने सुरू असायचे, मात्र या वेळी केवळ वैद्यकीय सेवा म्हणजे औषधांची दुकाने व दवाखानेच सुरू राहतील.
RamPrahar – The Panvel Daily Paper