नवी मुंबई : बातमीदार – गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे तसेच दूध भुकटीला 50 रुपये प्रति किलो अनुदान द्यावे. यासाठी भाजपातर्फे नवी मुंबईत दुधाच्या गाड्या अडवून जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
भाजपाने मविआविरोधात 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार नवी मुंबईत वारणा सर्कलजवळ दुधाच्या गाड्या अडवून हे आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य सरकार विरोधत घोषणा देण्यात आल्या.
सरकार बसलंय कोरोनाच्या तिरडीवर आणि दूध उत्पादक संकटाच्या दरडीवर, एल्गार दूध उत्पादक शेतकर्यांचा नारा आंदोलनाचा, सरकारची माया आटली दूध उत्पादकांच्या हाती राहिली भावाची रिकामी किटली अशा आशयाच्या घोषणा भाजपातर्फे देण्यात आल्या. दूध उत्पादक शेतकरी संकटात आहेत. दूधाचा भाव वाढवून द्यावा यासाठी राज्यभरातून मागणी वाढत आहे. त्यात संपूर्ण चार महिने लॉकडाऊनमध्ये राज्याला विनाअडथळा दूध पूरवठा शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. डिझेलचे भाव वाढले आहेत. मात्र तरीही दुधाला व दुधाच्या भुकटीला मात्र भाव मिळताना दिसत नाही. हे सर्व विषय घेत भाजपाने मविआ विरोधात एल्गार आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार नवी मुंबईत देखील आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी महापौर सागर नाईक, दत्ता घंगाळे, विकास सोरटे, सतीश निकम तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper