मोहोपाडा ः प्रतिनिधी
चौक ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत लोधिवली ग्रामपंचायत अस्तित्वात आली. सदर ग्रामपंचायतीला पाच वर्षेही पूर्ण झाली नाही तोच लोधिवली ग्रामपंचायतीचे नाव तालुक्यात चांगलेच चर्चेत आहे. या ग्रामपंचायतीकडून आदिवासी बांधवांना दोन वर्षे 15 टक्के आदिवासी निधी न मिळाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांसह आदिवासी बांधवांनी मंगळवारी (दि. 18) चक्क लोधिवली ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकले.
लोधिवली ग्रामपंचायतीचे सरपंचपद आदिवासी असतानाही आदिवासी विकासासाठी कोणताही विकास व वापरण्यात येणारा 15 टक्के निधीचा उपयोग आदिवासींकरिता होत नसल्याबाबत राजिप अध्यक्ष व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे नढाल ठाकूरवाडी येथील आदिवासी बांधवांनी 20 जानेवारी रोजी पत्रव्यवहार केला होता. शिवाय वारंवार ग्रामपंचायतीकडेही आदिवासी बांधवांकडून विचारणा होत होती, परंतु ग्रामविकास अधिकारी व सरपंच टाळाटाळ करीत असल्याचे ग्रामस्थ आदिवासी बांधवांनी सांगितले.
लोधिवली ग्रामपंचायतीकडून अन्याय होत असल्याने आदिवासी बांधवांनी मंगळवारी ग्रामपंचायत कमिटीला धारेवर धरले. या वेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामपंचायत हद्दीतील सर्व आदिवासी बांधव व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कमिटीला कार्यालयाबाहेर काढून टाळे ठोकले. या वेळी ग्रामपंचायतीसह जबाबदार अधिकार्यांची चौकशी करा, अशी मागणी आदिवासी बांधवांनी व ग्रामस्थांनी केली. या वेळी शेकडो ग्रामस्थ व आदिवासी बांधव उपस्थित होते. या वेळी माजी उपसभापती श्याम साळवी, मारुती तवले, एकनाथ सांगले आदींसह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ उपस्थित होते.