नवी मुंबई : बातमीदार
लॉकडाऊनमुळे सध्या आंतरजिल्हा प्रवास करण्यास बंदी घातली आहे. प्रवासाची परवानगी हवी असल्यास शासनाकडून ई-पाससाठी अर्ज करावा लागतो तरच प्रवास करता येतो. मात्र असंख्यवेळा अर्ज करूनहू नागरिकांना ई पास मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याविरोधात नवी मुंबई मनसेकडून ऐरोली टोल नाक्यावर ई पास जाळून राज्य शासनाचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. उपशहरप्रमुख निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
केंद सरकारने सर्व राज्यांना ई-पास सेवेतून जनतेला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाकडून मात्र ई-पास सेवा बंद करण्यात आलेली नाही. या कारणास्तव मुंबई, ठाण्यातील चाकरमान्यांना कोकणातील गणेशोत्सवाला मुकावे लागले आहे. मुख्य म्हणजे अर्ज करूनही ई-पास मिळत नसल्याने नागरिक उघडपणे नाराजी वर्तवू लागले आहेत. स्वतः ई पासाठी अर्ज केल्यास अर्ज मिळत नसताना दलालांकडून मात्र हवे तेव्हढे अर्ज मिळत आहेत. त्यामुळे हे गौडबंगाल नक्की काय आहे असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. या पासमुळे दलालांचे राज्यात फावले आहे. त्यामुळे सामन्यांना त्रासदायक ठरणारी ई-पास सेवा बंद करून राज्यातील जनतेला मोकळा श्वास घेऊ द्यावा अशी मागणी करत ऐरोली टोलनाक्यावर मनसेच्यावतीने उपशहराध्यक्ष निलेश बाणखेले व प्रसाद घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ई-पास जाळत आंदोलन करण्यात आले व राज्य सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या यावेळी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.