87 वर्षांची परंपरा खंडित
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) देशातील सर्वांत मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कळविली आहे. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रूपात दररोज 45 हजार रुपये कमावणार्या खेळाडूंना नुकसानभरपाई देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
तब्बल 87 वर्षांनंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे, मात्र महिलांच्या क्रिकेट हंगामाला मार्चमध्ये प्रारंभ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या साथीमुळे देशांतर्गत क्रिकेट हंगाम यंदा दिरंगाईने सुरू झाला आहे. सहा जैव-सुरक्षित केंद्रांवर सध्या सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. रणजी करंडक स्पर्धेबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता होती, परंतु याबाबत योग्य तोडगा निघू शकला नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीसुद्धा रणजी स्पर्धेसाठी आग्रही होते, पण अखेर रणजी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका दिवसाच्या लढती असतात. देशातील सहा मुख्य शहरांमध्ये मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर विजय हजारे स्पर्धादेखील खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक पुढच्या आठवड्यात अंतिम करण्यात येईल.
RamPrahar – The Panvel Daily Paper