माणगाव : प्रतिनिधी
अवकाळी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे, मात्र हवामानाच्या संकटावर मात करून माणगाव तालुक्यातील शेतकर्यांनी कलिंगडाचे यशस्वी पीक घेतले असून, शेतातील कलिंगड विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. अवकाळी पाऊस, खराब हवामान आणि त्यातच कोरोना महामारीचे लॉकडाऊन यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. यावर मात करीत शेतकर्यांनी अपार कष्ट घेऊन कलिंगडाची शेती पिकविली आहे. त्यांच्या या मेहनतीचे फळ मिळाले असून, बाजारात कलिंगड विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. कलिंगड फळाला घाऊक विक्रीसाठी 10 ते 13 रुपये प्रतिकिलो भाव मिळत असून, बाजारपेठेत कलिंगड 15 ते 20 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. पर्यटक व ग्राहक ऐन उन्हाळ्यात कलिंगड मिळत असल्याने खूश असून, दुसरे कोणतेही फळ वा सरबत पिण्यापेक्षा ताज्या व लालबुंद कलिंगडांना पसंती देत आहेत.
कलिंगडाचे आधीचे पीक नुकसानीत गेले. त्यानंतर धाडस करून लावलेल्या कलिंगडांना चांगली मागणी आहे. त्यामुळे झालेला तोटा भरून निघेल अशी आशा आहे.
-रोहन वडेकर, युवा शेतकरी
खराब हवामानातही शेतकरी मेहनत करून पीक घेत आहेत. सरत्या वर्षी अवकाळी पावसामुळे पीक उत्पादनावर परिणाम झाला, परंतु पुढील काळात हवामान अनुकूल राहिल्यास चांगले उत्पादन व योग्य भाव मिळेल. -संदीप खडतर, अध्यक्ष, आत्मा शेतकरी संघटना
RamPrahar – The Panvel Daily Paper