खालापूर : प्रतिनिधी
माझ्या मृत्यूनंतर माझे उत्तरकार्य न करता त्या खर्चातून गोरगरिबांना दान करा, अशी शेवटची इच्छा वडिलांनी व्यक्त केली आणि वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तरकार्य न करता मुलाने आदिवासी बांधव, वृद्धाश्रमातील वृद्ध आणि लहान मुलांना मिठाईचे वाटप केले व धार्मिक परंपरेला शह देत लोकांसमोर आदर्श ठेवला आहे. खोपोली शहरातील काटरंग गावात केसरवानी कुटूंबिय अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. जय करणलाल केसरवानी हे नेहमी गोरगरीबांना मदत करीत असत. माझ्या मृत्यूनंतर उत्तरकार्याच्या खर्चातून गोरगरिबांच्या मुखात अन्न घाला, अशी इच्छा त्यांनी मुलगा रजत केसरवानी यांच्याकडे व्यक्त केली होती. वडिलांच्या इच्छनुसार रजत यांनी खोपोलीतील गगनगिरी आश्रमाशेजारी असलेल्या ठाकुरवाडीतील बांधवाना मिठाई वाटप करत खाऊसाठी पैसेही दिले. त्याचप्रमाणे महड येथील आदित्य वृद्धाश्रमातील वृद्ध आणि अनाथ मुलांनाही मिठाईचे वाटप केले. या वेळी कै. जय केसरवानी यांच्या पत्नी सरोज, मुलगा रजत, स्नुषा स्वाती, नातू आयुष तसेच स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक कांचन जाधव उपस्थित होत्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper