नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत प्रगती करीत आहे. मोदी सरकार गाव, गरिब आणि शेतकर्यांच्या हितासाठी बांधिल आहे, असे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे. ते राज्यसभेत बोलत होते.
कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले की, 70 हजार कोटी रुपये गावांच्या विकासासाठी देण्यात आले आहेत. येत्या पाच वर्षांत ग्रामीण भागावर दोन लाख 80 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागाचा विकास करणे मोदी सरकार प्रमुख लक्ष्य आहे.
कोरोना लशीसंदर्भात बोलताना कृषिमंत्री तोमर म्हणाले की, देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कोरोना महामारीविरोधात सक्षमपणे लढला. आता भारत आपल्या देशासह इतर देशांना कोरोना लशीचा पुरवठा करीत आहे. ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोरोना लशींच्या सक्षमतेमुळे देशाचा आत्मविश्वास वाढला आहे.
‘मनरेगासाठी आम्ही सातत्याने निधी वाढवत आहोत. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला, त्या वेळी आम्ही मनरेगासाठी 61 हजार कोटी रुपयांचा निधी 1.1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवला. या काळात 10 कोटी लोकांना रोजगार पुरवण्यात आला. गरिबांसाठी आणण्यात आलेल्या योजनांमुळे अनेकांच्या जीवनामध्ये बदल झाला आहे,’ असेही कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले.
कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्यांविषयी भाष्य करताना सांगितले की, सरकार कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार आहे. याचा अर्थ असा नाही की कृषी कायद्यांमध्ये काही चुकीचे आहे. एका विशिष्ट राज्यातील शेतकर्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. कृषी कायद्यांमध्ये काळे असे काय आहे? असा सवाल मी दोन महिने करीत राहिला, पण अजूनही मला त्याचे उत्तर मिळाले नाही. ते पुढे म्हणाले, शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आणि शेती सेक्टरचा जीडीपीमधील सहभाग वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कृषी कायदे त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. मला सभागृहाला आणि शेतकर्यांना सांगावेसे वाटते की, मोदी सरकार शेतकर्यांच्या भल्यासाठी बांधिल आहे.
Check Also
कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …
RamPrahar – The Panvel Daily Paper