टीम इंडिया पुन्हा टाकणार फिरकीचे जाळे
अहमदाबाद : वृत्तसंस्था
टीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्याच्या निर्धाराने टीम इंडिया चौथ्या कसोटीत मैदानावर उतरणार आहे.
डे नाइट कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडचा संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला, पण ते टीम इंडियालाही शर्यतीतून बाहेर काढू शकतात व ऑस्ट्रेलियाचा मार्ग मोकळा करू शकतात.
भारतीय संघही त्यांचे आव्हान परतवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यासाठी बीसीसीआयने ट्रिकी खेळपट्टी तयार केली. याशिवाय चौथ्या कसोटीत टीम इंडिया दोन बदलांसह मैदानावर उतरणार आहे.
चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयकडे सुटी मागितली. ती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे.
तिसर्या कसोटीचा निकाल दोन दिवसांत लागला. अक्षर पटेलने दोन्ही डावांत मिळून 11 विकेट्स घेतल्या होत्या, तर आर. अश्विनने सात गडी बाद केले. या सामन्यात 30 पैकी 28 विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या. त्यामुळे खेळपट्टीवरून वाद सुरू आहे.
अशात चौथ्या कसोटीसाठीही फिरकीला पोषकच खेळपट्टी बनवण्यात आली. खेळपट्टीवर गवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहली संघात दोन बदल करण्याच्या तयारीत आहे. बुमराहच्या जागी उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. यादवने नुकतीच फिटनेस टेस्ट पास केली आहे.
तिसर्या कसोटीत वॉशिंग्टनला जास्त षटके टाकण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या जागी कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पटकावू शकतो. कुलदीप, आर. अश्विन आणि अक्षर पटेल या तीन फिरकीपटूंसह संघ मैदानावर उतरण्याची शक्यता आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper