सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली
पेण : प्रतिनिधी – बारावी व दहावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी दाखले मिळविणार्यांची पेण तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रात गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
मार्च महिन्यापासून तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्ण कर्मचार्यांच्या उपस्थितीत होत नसल्याने आणि दाखल्यांचे काम बंद असल्याने नुकताच जाहीर झालेल्या दहावी, बारावीच्या निकालामुळे दाखल्याबाबत पालकवर्गामध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. पुढील शैक्षणिक कामासाठी दाखले मिळावेत म्हणून गेल्या आठवडाभरापासून तहसील कार्यालयात विद्यार्थी व पालकांची वर्दळ वाढली आहे. त्यातच सेतू केंद्रातील काम वेगाने होत नसल्याने नागरिकांची गर्दी होत असून, तहसील कार्यालयात सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे.
पेण तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दाखल्यांसाठी होत असलेली गर्दी प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. त्यातच पालकवर्ग व विद्यार्थ्याची गर्दी तहसील कार्यालयात होत असताना अनेक जण आपली वाहने कार्यालयाच्या मोकळ्या जागेत पार्क करून ठेवल्याने दाखल्यांसाठी येणार्यांचे अन्य नागरिकांचे हाल होत आहेत.
प्रशासनाने दाखल्यासंदर्भात तलाठ्यांमार्फत गावोगावी कॅम्प घेतल्यास कोरोनाचा धोका टाळून सर्वसामान्यांना दाखले उपलब्ध होतील. याकडे तहसीलदारांनी लक्ष घालावे, अशी नागरिकांची अपेक्षा व मागणी आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper