नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भाजप निवडणूक जिंकण्याचे मशीन नाही, तर देशातील नागरिकांची हृदय जिंकण्याचे अभियान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 6) केले. ते दिल्लीत भाजपच्या 41व्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. या वेळी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कामाचा आणि प्रवासाचा लेखाजोखा मांडला, तसेच विरोधकांवर टीकास्त्रही डागले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकांना दिल्या जाणार लाभावरून आमच्या सरकारचे मूल्याकंन केले जातेय. सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्याचा हा एक प्रकारचा मूलमंत्रच झालाय. असे असतानाही भाजपने निवडणूक जिंकली तर मशीन म्हटले जाते अन् इतर पक्षाने निवडणूक जिंकली तर कौतुक केले जाते. असे का? पण असे म्हणणार्या लोकांना लोकशाहीची परिपक्वता कळालेली नाही. या लोकांना भारतीयांच्या आशा अपेक्षाही समजत नाहीयेत. भाजप सत्तेत असो वा विरोधी बाकांवर जनतेशी नाळ कायम ठेवलेली आहेच. भाजप निवडणूक जिंकणारा नव्हे तर हृदय जिंकणारा पक्ष आहे आणि भाजपला ही ताकद कार्यकर्ते देतात. ते लोकांमध्ये राहून काम करतात आणि पक्षाची ताकद वाढवतात. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच भाजप आज जगातील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे.
दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करीत म्हटलेय की, आपल्या परिश्रमातून भाजपला एका विशाल वटवृक्षात रूपांतर करणार्या सर्व महापुरुषांना प्रणाम. राष्ट्रवादी विचारधारा, अंत्योदय सिद्धांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजप नेहमी प्रयत्नशील राहिल.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper