पाली : प्रतिनिधी
सह्याद्री प्रतिष्ठानच्या मुरूड विभागातर्फे ऐतिहासिक बिरवाडी किल्ल्यावर नुकतीच दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. यावेळी गडावरील अनेक वास्तूंचे संवर्धन व स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत गडावरील जोते आणि सदरेच्या दगडांचा ढिग मोकळा करण्यात आला. या विस्कळीत भिंतीचे दगड मुळ बांधणीला न हलवता व्यवस्थित बसविण्यात आले. किल्ल्यावरील बुरुज, पायर्या व इतर ठिकाणचे वाढलेले गवत काढण्यात आले. पाण्याची टाकी, गडावरील वास्तू व मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत, ऋतिक भोसले, वेदांत भोसले, रोहित चोरघे, आश्विन विरकुड, आविष्कार शिवणकर आदी सभासद सहभागी झाले होते. भविष्यात या किल्ल्याच्या संवर्धनासाठी स्थानिक ग्रामस्थांसोबत चर्चा केली जाईल. व लवकरच पुढील संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात येईल. असे ऋतिक भोसले यांनी सांगितले.
ऐतिहासिक महत्व
जंजिर्याच्या सिद्दीला शह देऊन शिवरायांनी इ.स.1658 मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला. मराठे व सिद्दी अशा राजवटी या किल्ल्यावर होऊन गेल्या. किल्ल्याचे बांधकाम सुस्थितीत असून या गडावर पिण्याच्या पाण्याची भरपूर सोय आहे. गडावर संवर्धन कामे वेगाने होणे अपेक्षित आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper